मोहनदास गांधी यांच्या हत्येनंतरच्या महाराष्ट्रातील दंगलीत ५ सहस्र ब्राह्मणांच्या हत्या झाल्या !

इतिहासकार विक्रम संपत यांचा ‘टाइम्स नाऊ’ वृत्तवाहिनीवरून गंभीर आरोप !

  • स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बंधूची हत्या !

  • २० सहस्र घरे आणि दुकाने जाळण्यात आली !

  • एकही गुन्हा नोंद नाही !

  • दंगलीमागे काँग्रेसचे नेते आणि ब्राह्मणद्वेषी संघटना !

  • तत्कालीन वृत्तपत्रांनी बातम्या दडपल्या !

तथाकथित ‘गांधीवादी’ काँग्रेसवाल्यांचा हा इतिहास इतिहासकारांनी पुढे आणला पाहिजे. तसेच केंद्रशासनाने त्याची सत्यता पडताळून तो शालेय अन् महाविद्यालयीन अभ्यासक्रमांत शिकवला पाहिजे ! अशी काँग्रेस अद्यापही या देशात अस्तित्वात आहे, हे हिंदूंना लज्जास्पद !

इतिहासकार विक्रम संपत

मुंबई – चित्पावन ब्राह्मण असलेले पंडित नथुराम गोडसे यांनी ३० जानेवारी १९४८ या दिवशी मोहनदास गांधी यांची हत्या केल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी मुंबईसह महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणविरोधी दंगली घडवल्या. यात २० सहस्र ब्राह्मणांची घरे आणि दुकाने जाळण्यात आली. २ ते ५ सहस्र ब्राह्मणांच्या हत्या करण्यात आल्या. ही संख्या ८ सहस्रही असू शकते. महिला आणि मुले यांनाही लक्ष्य करण्यात आले. या दंगलीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे भाऊ नारायण दामोदर सावरकर यांचीही हत्या करण्यात आली होती. एवढा मोठा नरसंहार होऊनही पोलिसांनी एकही गुन्हा नोंदवला नाही. काँग्रेसच्या दबावामुळे हे घडले, असा आरोप प्रसिद्ध लेखक आणि इतिहासकार विक्रम संपत यांनी ‘टाइम्स नाऊ’ या वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात केला. संपत यांनी २ खंडांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे चरित्र लिहिले आहे. ‘सावरकर (भाग १) : इकोज फ्रॉम अ फरगॉटन पास्ट (विस्मृतीत गेलेल्या भूतकाळाच्या प्रतिध्वनी), १८८३-१९२४’ आणि ‘सावरकर (भाग २) अ कन्टेस्टेड लेगसी (वारसा संघर्षाचा), १९२४-१९६६’ अशी त्यांची नावे आहेत.

विक्रम संपत म्हणाले की,

१. आजच्या पिढीला हा नरसंहार ठाऊक नाही. वर्ष १९८४ मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर शिखांचा नरसंहार झाला, तसाच वर्ष १९४८ मध्ये ब्राह्मणांचा झाला होता. नागपूरमध्ये काँग्रेसच्या १०० दंगलखोर कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती; मात्र त्यांच्यावर गुन्हा नोंदवला गेला नाही.

२. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर पुस्तक लिहित असतांना अनेकांशी भेट झाली. त्यांतील काहींचे पूर्वज या नरसंहारात बळी पडले होते.

३. मोहनदास गांधी यांच्या हत्येमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांना आरोपी बनवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना राजकीयदृष्ट्या बहिष्कृत करण्यात आले. न्यायालयाने त्यांना निर्दाेष घोषित केले होते.

४. त्या काळातील भारतीय वर्तमानपत्रांनी या दंगलींच्या बातम्यांना अल्प प्रमाणात प्रसिद्धी दिली; मात्र विदेशातील वृत्तपत्रांनी याला चांगली प्रसिद्ध दिली होती. ‘गांधी यांच्या अनुयायींनी घडवलेल्या ब्राह्मणविरोधी हिंसाचार पसरवण्यासाठी काही संघटनांनीही साथ दिली’, असे या विदेशी वृत्तपत्रांनी नमूद केले होते.

५. रा.स्व.संघ आणि हिंदु महासभा यांच्या कार्यालयांची तोडफोड करण्यात आली.

६. पोलिसांनी या दंगलींविषयीची कागदपत्रे मला दाखवण्यास नकार दिला.

७. पुरोगामी त्यांच्या विचारांच्या व्यतिरिक्त अन्य विचारांना थारा देत नाहीत. जेव्हा इतिहासावर चर्चा होते, तेव्हा संकुचित विचार पुढे केला जातो. इतिहासाचा अनेक भाग दडपला जातो. त्यास बाहेर काढण्याची आवश्यकता आहे. स्वातंत्र्यानंतरच्या शासनकर्त्यांनी त्यांच्या सोयीनुसार भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास लिहून घेतला.