सनातनच्या ९५ व्या संत पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी (वय ८२ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

२३ जुलै २०२१ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या या दिवशी गुरुतत्त्व सहस्र पटींनी कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या संतांविषयी लिखाण प्रकाशित करत आहोत. 

या लेखमालेत आज २० जुलै २०२१ या दिवशी आपण रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील सनातनच्या ९५ व्या संत पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी (वय ८२ वर्षे) यांचा साधनाप्रवास पाहूया !

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/496534.html

जन्मदिनांक – ३१.१२.१९३९
जन्मतिथी – मार्गशीर्ष कृष्ण पक्ष षष्ठी
संतपद प्राप्त – २२.५.२०१९

१. जन्म आणि बालपण

‘माझा जन्म ३१.१२.१९३९ या दिवशी अकोला जिल्ह्यातील राजंदा या खेडेगावी झाला. माझे वडील एक कर्मठ याज्ञिक ब्राह्मण होते. ते पौरोहित्य करायचे. मी सातवीत असतांनाच माझी आई वारली. त्या वेळी घरात मी सर्वांत मोठी होते आणि माझ्या पाठी तीन लहान भावंडे होती. त्या वेळी ‘वडिलांनी पुनर्विवाह करावा’, यासाठी नातेवाइकांनी त्यांना बराच आग्रह केला; परंतु ‘मुलांचे हाल होऊ नयेत’, यासाठी वडिलांनी पुनर्विवाह केला नाही. भावंडे लहान असल्याने साहजिकच घराचे दायित्व माझ्यावर आले. त्या वेळी मला स्वयंपाकही करता येत नव्हता. वडिलांचे कडक सोवळे असल्याने ते बाहेरचे काही खात नसत. त्या वेळी ओले सोवळे नेसून स्वयंपाक करावा लागायचा. आरंभी तेच घरी स्वयंपाक करायचे. त्यानंतर मला शिकण्याची आवड असूनही शाळा सोडून द्यावी लागली. शेजारच्या एका नातेवाईक स्त्रीकडून मी सोवळ्यात स्वयंपाक करायला शिकले.

१ अ. भावंडांच्या पुढील शिक्षणासाठी राजंदा येथून अकोला येथे येणे आणि तेथे प्रतिकूल परिस्थितीत दिवस काढावे लागणे : काही वर्षांनंतर गावात पटकीची (कॉलर्‍याची) साथ आली, तसेच माझ्या भावंडांना पुढे शिकायचे होते. त्यामुळे आम्हाला आमचे गाव सोडून जिल्ह्याच्या ठिकाणी, म्हणजे अकोला येथे यावे लागले. आरंभी आम्ही जेथे रहायचो, तेथे पाण्याचे दुर्भिक्ष्य होते. आम्हाला लांबून विहिरीचे पाणी आणावे लागायचे. तेथे शौचालयाचीही व्यवस्था नव्हती. नंतर आम्ही जेथे घर घेतले, तेथे शौचालय होते; परंतु तेथे घराच्या अवतीभोवती सखल भाग होता. त्यामुळे तेथे पावसाळ्यात पाणी साचायचे. आजूबाजूला बेडूक, किडे-कीटक यांचे आवाज सतत येत असायचे. त्यामुळे आम्हाला भीती वाटायची.

एकदा बराच पाऊस पडल्याने आमच्या घरात पाणी शिरले. त्या वेळी आम्ही एका खाटेवर बसून स्वयंपाक केला. माझ्या एका भावाने हातात स्टोव्ह (रॉकेलवर चालणारी शेगडी) धरला. दुसर्‍याने तो पेटवला आणि मी मटकीला फोडणी दिली. मटकी पाण्यामुळे आधीच भिजली होती. आम्ही तिचीच उसळ करून खाल्ली. हा प्रसंग उदाहरणादाखल येथे मांडला आहे. असे कितीतरी कठीण प्रसंग माझ्या जीवनात आले; परंतु देवाच्या कृपेने आम्ही त्यांतून बाहेर पडलो.

१ आ. वडिलांनी समाजाची भीड न बाळगता मुलीवर चांगले संस्कार करणे : माझे वडील अकोला येथील श्री मुकुंद मंदिरात भागवत वाचायचे, तसेच तेथील दत्तमंदिरात गुरुचरित्राचे वाचन करायचे. वडील मला तेथे सकाळ-सायंकाळ दिवा लावायला सांगायचे. तेव्हा तेथील स्त्रिया वडिलांना सांगायच्या, ‘‘हिला शाळेत पाठवा. हिला नऊवारी साडी नेसायला सांगू नका. इतक्या लहान मुलीला कामे का सांगता ?’’; परंतु वडिलांनी माझ्यावर संस्कार करणे सोडले नाही. त्यांनी त्यातूनच मला घडवले.

२. वैवाहिक जीवन

घरच्या दायित्वामुळे माझा विवाह उशिरा झाला. तेव्हाच्या पद्धतीनुसार मी विवाहापूर्वी यजमानांना पाहिलेच नव्हते. केवळ ‘माझ्या सासू-सासर्‍यांचे नाव ‘सीताबाई’ आणि ‘रामचंद्र’ आहे’, हे कळल्यावर मी विवाहाला होकार दिला. श्रीरामाच्या कृपेने माझे वैवाहिक जीवन चांगले गेले. माझे सासरे स्वभावाने तापट असले, तरी त्यांनी माझा सांभाळ प्रेमाने केला. सासूबाईंचा स्वभाव जरी विचित्र असला, तरी यजमान प्रत्येक प्रसंगात साहाय्य करत असल्याने सासूबाईंच्या वागण्याचा मला त्रास झाला नाही.

२ अ. एकत्र कुटुंबपद्धतीमुळे कामांचा पुष्कळ व्याप असणे : सासरी एकत्र कुटुंबपद्धत होती. आम्ही जवळजवळ २५ ते ३० जण एकत्र रहायचो. त्यामुळे कामांचा पुष्कळ व्याप होता. स्वयंपाक, धुणी-भांडी, घराची स्वच्छता, अशी सर्वच कामे करावी लागायची. घर मातीचे असल्याने प्रसंगी भिंती शेणामातीने सारवणे इत्यादी कामेही असायची. नंतर जावा (दीरांच्या पत्नी) आल्याने त्याही मला साहाय्य करायच्या.

२ आ. अपत्ये : त्या काळी बाळंतपणेही घरीच असायची. मला दोन मोठ्या मुली आणि त्यांच्या पाठीवर दोन मुले, अशी चार अपत्ये झाली. देवाच्या कृपेने तेही दिवस आनंदात गेले.

२ इ. यजमानांनी विविध व्यवसाय करणे आणि त्यांचे उत्पन्न जेमतेम असल्याने घरी गरिबी असणे : यजमान प्रारंभी वन विभागात नोकरी करायचे. त्यांच्या आईने सांगितल्याप्रमाणे ते नोकरी सोडून आईची सेवा करायला आले. त्यानंतर काही काळ ते शेती करायचे. त्यानंतर त्यांनी ‘स्टॅम्प व्हेंडर’ (खरेदी-विक्री करण्यासाठी लागणार्‍या स्टॅम्पचे विक्रेते) म्हणून व्यवसाय चालू केला. कालांतराने त्यांनी ‘पिटिशन रायटर’ (दस्तलेखक) म्हणून व्यवसाय चालू केला. त्यांचे उत्पन्न जेमतेम असल्याने घरी गरिबी होती.

२ ई. यजमानांनी अनेक जणांना साहाय्य करणे, प्रसंगी व्यवसाय बंद ठेवूनही भजनाला जाणे, त्या काळात अर्थार्जन नसणे आणि त्या स्थितीतही त्यांनी मुलांचे लाड पुरवणे : यजमान प्रत्येकाला साहाय्य करायचे. ते धार्मिक वृत्तीचे असल्याने प्रतिवर्षी पंढरपूरला जाण्यासाठी निघणार्‍या दिंडीला अन्नदान करायचे. त्यानंतर ते स्वतःही बरीच वर्षे वारीला गेले. त्यांना भजन-कीर्तनाची आवड असल्याने ते प्रसंगी व्यवसाय बंद ठेवूनही भजनाला जायचे. त्यामुळे त्या काळात अर्थार्जन नसायचेच. त्याही स्थितीत ते मुलांचे सर्व लाड पुरवायचे.

२ उ. प्रतिकूल परिस्थितीतही सर्व मुलांनी शिक्षण पूर्ण करणे : देवाच्या कृपेने मुले समंजस होती. चटणी-भाकरी खाऊनही ती आनंदात रहात. कालौघात दोन्ही मुलींचे (आताच्या सौ. माया पिसोळकर आणि सौ. छाया देशपांडे यांचे) पदवीपर्यंतचे शिक्षण होऊन त्यांची लग्ने झाली. थोरला मुलगा (श्री. राजेश) बारावीनंतर कर्ज काढून स्वबळावर अभियंता झाला. धाकट्या मुलानेही (अधिवक्ता योगेश जलतारे यांनीही) वकिलीचे शिक्षण पूर्ण केले. एकूण आमचे व्यावहारिक जीवन कष्टात गेले असले, तरी समाधानात व्यतीत झाले.

३. सनातन संस्थेच्या संपर्कात येण्यापूर्वी केलेली साधना

घरी आधीपासूनच धार्मिक वातावरण असल्याने देवाधर्माचे काहीतरी करण्याचे बाळकडू मला लहानपणीच मिळाले होते. सासरी यजमान सोडून इतर कुणी देवाचे फार करणारे नसले, तरी त्यांनी मला त्यासाठी विरोध केला नाही. त्यामुळे माझी ‘भागवत सप्ताहाला जाणे, नित्यनेमाने मंदिरात दर्शनासाठी जाणे, भजनाला जाणे’, अशी थोडीफार साधना चालूच होती. त्या वेळी कुणीतरी मला आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी काही व्रतवैकल्ये करायला सांगितली. तीही मी केली आणि त्यानंतर खरोखरच त्याची प्रचीती येऊन आमची आर्थिक स्थिती काही प्रमाणात सुधारली.

(क्रमश: उद्याच्या अंकात)

– (पू.) श्रीमती कुसुम जलतारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.७.२०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

सनातन संस्थेच्या सर्व संतांच्या साधनाप्रवासावर आधारित ग्रंथ प्रकाशित करण्यासाठी सर्व संतांनी स्वतःच्या संदर्भातील, तसेच वाचक अन् साधक यांनी संत आणि संतांच्या अनुभूतींच्या संदर्भातील लिखाण लवकरात लवकर पाठवावे !

‘सनातनच्या संतांच्या लिखाणातून सर्वांना आनंद मिळावा, तसेच त्यांच्या साधनाप्रवासातून सर्वांना शिकता यावे’, यासाठी सनातन संस्थेच्या सर्व संतांच्या साधनाप्रवासावर आधारित ग्रंथ प्रकाशित करण्यात येणार आहेत. यासाठी सर्व संतांनी स्वत:चे साधनापूर्व जीवन, साधनाप्रवास, त्यांनी साधक आणि जिज्ञासू यांना केलेले वैशिष्ट्यपूर्ण मार्गदर्शन इत्यादी सर्व लिखाण शक्य तितक्या लवकर पाठवावे (यापूर्वी जे लिखाण पाठवले असेल, ते कृपया पुन्हा पाठवू नये.), तसेच वाचक आणि साधक यांनी त्यांना संतांकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि संतांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती पाठवाव्यात. लिखाण शक्यतो टंकलेखन करून पाठवावे.

लिखाण पाठवण्यासाठी संगणकीय पत्ता : [email protected]

पोस्टाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, २४/बी, सनातन आश्रम, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. ४०३४०१