मुंबईत भर रस्त्यात अधिवक्त्यावर काठी आणि तलवारी यांच्या साहाय्याने प्राणघातक आक्रमण !

लोकहो, पोलीस आणि प्रशासन रक्षण करील, या भ्रमात न रहाता, स्वत:च्या आणि आप्तांच्या रक्षणासाठी स्वरक्षण प्रशिक्षण घ्या !

अधिवक्ता सत्यदेव जोशी यांच्यावर ५-६ जणांच्या टोळक्याने भर रस्त्यावर काठी आणि तलवारी यांद्वारे प्राणघातक आक्रमण केले

मुंबई – शहरातील कांदिवली येथे अधिवक्ता सत्यदेव जोशी यांच्यावर ५-६ जणांच्या टोळक्याने दिवसाढवळ्या भर रस्त्यावर काठी आणि तलवारी यांद्वारे प्राणघातक आक्रमण केले होते. या आक्रमणात जोशी गंभीर घायाळ झाले. ही घटना ८ जुलै या दिवशीची असून मारहाणीचे चलचित्र सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्यात आले आहे. त्यानंतर प्रसारमाध्यमांनी या वृत्ताला प्रसिद्धी दिली. गंभीर गोष्ट म्हणजे अधिवक्ता जोशी यांना मारहाण होत असतांना आजूबाजूचे लोक हा प्रकार पहात होते; मात्र त्यांची सुटका करण्यासाठी कुणीही पुढे आले नाही. या प्रकरणी पोलिसांनी ३ जणांना अटक केली असून या प्रकरणाचे अन्वेषण चालू आहे. भूमीच्या वादातून आक्रमण झाल्याचे पोलिसांच्या अन्वेषणातून समोर आले आहे.