धर्मांतर रोखण्यासाठी संपूर्ण देशात धर्मांतरबंदी कायदा लागू करायला हवा ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

‘न्यूज १८ लोकमत’ या वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात हिंदु जनजागृती समितीचा सहभाग !

बीड जिल्ह्यातील शिरसाळा तालुक्यातील इरफान खान पठाण या युवकाला मूकबधिर हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर केल्याच्या प्रकरणी नुकतीच अटक करण्यात आली. धर्मांधांकडून हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर होत असल्याचे, तसेच यासाठी आखाती देशांतून हवालाद्वारे पैसा पुरवला जात असल्याचे समोर येत आहे. त्यासाठी ‘कोडवर्ड’चा उपयोग करण्यात येत होता. नुकतेच उत्तरप्रदेशात १ सहस्र जणांचे बलपूर्वक धर्मांतर करण्यात आल्याचे उघड झाले होते. या प्रकरणी अन्वेषण यंत्रणा तपास करत आहेत. या पार्श्वभूमीवर ‘न्यूज १८ लोकमत’ या वृत्तवाहिनीवर ‘धर्मांतराचे टूलकिट’ हे चर्चासत्र घेण्यात आले. यात हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट हे सहभागी झाले होते. तसेच भाजपचे आमदार राम कदम, शमशुद्दीन तांबोळी आणि मौलाना मुफ्ती असगर खोपटकर यांनीही त्यांचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘न्यूज १८ लोकमत’चे विशाल परदेशी यांनी केले. या कार्यक्रमाचा वृत्तांत येथे देत आहोत.

श्री. सुनील घनवट

मुंबई – धर्मांतराच्या संदर्भात उघड झालेल्या घटना देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहेत. धर्मांतराच्या घटना प्रामुख्याने उत्तरप्रदेशात घडल्या आहेत. उत्तरप्रदेशात गुन्हेगारी कारवाया करून धर्मांध गाझियाबाद येथे पळून जातात. उत्तरप्रदेश येथे आतापर्यंत झालेल्या दंगलींचे मूळ स्थान गाझियाबाद होते. नागरिकत्व सुधारणा कायद्याला (‘सीएए’ला) गाझियाबाद येथील धर्मांधांनी प्रथम विरोध केला होता. गाझियाबाद येथे स्वामी यति नरसिंहानंद सरस्वती यांच्यावर धर्मांधांनी जीवघेणे आक्रमण केले होते. हे सर्व पहाता धर्मांधांच्या कारवायांची पाळेमुळे उखडून टाकायला हवीत. त्यामुळे धर्मांतराच्या कारवाया रोखण्यासाठी संपूर्ण देशामध्ये ‘धर्मांतरबंदी कायदा’ लागू करायला हवा, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले.

भारत ‘हिंदु राष्ट्र’ असून धर्मांतराचे प्रकार पुन्हा होणार नाहीत, यासाठी मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त करायला हवे ! – राम कदम, आमदार, भाजप

१. बलपूर्वक धर्मांतर करणे, ही निवळ धर्मांधता आहे. यासाठी पाकिस्तानसह विविध देशांतून पैसा येतो, तसेच हिंदूंना इच्छा नसतांना धर्मांतर करावे लागते, हे अत्यंत वाईट आहे. हिंदु धर्म हा कायम सहिष्णु आणि उदार राहिला आहे. याचा तसेच असाहाय्य हिंदूंच्या हतबलतेचा धर्मांध अपलाभ घेतात, हे अक्षम्य आहे. भारत हे हिंदु राष्ट्र आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ‘असे प्रकार पुन्हा होणार नाहीत’, असे आश्वस्त करायला हवे.

२. पालघर येथे हिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर चालू आहे. त्याच्या विरोधातही महाराष्ट्र सरकारने काही केले नाही. पालघर येथे साधूंचे हत्याकांड झाल्याप्रकरणी राज्य सरकारने सारवासारव केली. या घटनेत निवळ साधूंनी भगवी वस्त्रे परिधान केल्यामुळे त्यांना मारहाण करून त्यांची हत्या करण्यात आली. मारहाण करणार्‍यांना भगव्या रंगाचा राग का ?

३. महाराष्ट्रात येऊन हिंदूंसंदर्भात अपशब्द उच्चारणार्‍या शरजील उस्मानी याच्यावर कारवाई करणे, हे महाराष्ट्र सरकारचे कर्तव्य होते. त्याच्या वक्तव्यांनी हिंदु समाजाची मने दुखावली; मात्र हिंदू सहिष्णु असल्यामुळे ‘कायदा न्याय देईल’, या आशेवर ते शांत राहिले. राज्य सरकारने मात्र यासंदर्भात काहीच केले नाही.

‘कुराणमध्ये ‘इस्लामला बलपूर्वक धर्मांतर मान्य नाही’, असे सांगितले आहे. धर्मांतराचे हे प्रकरण जर सत्य असेल, हे चुकीचे आहे’, असे मत मौलाना मुफ्ती असगर खोपटकर यांनी व्यक्त केले.

शमशुद्दीन तांबोळी यांचा धर्मांधांना पाठीशी घालण्याचा प्रकार मान्यवरांनी केला उघड !

‘भारतामध्ये अनेक अल्पसंख्यांकांना आरोपी म्हणून अटक करण्यात आले; पण नंतर त्यांना निर्दाेष सोडण्यात आले. येथे केवळ बातम्यांवरून बोलणे चालू आहे’, अशी मखलाशी शमशुद्दीन तांबोळी यांनी केली. यावर राम कदम यांनी ‘ही वस्तूस्थिती आहे. पालघर येथे चला आणि तेथे होणारे धर्मांतर पहा’, असे आव्हान देऊन त्यांचा प्रतिवाद केला. तसेच ‘धर्मांतराच्या घटना आणि त्यासाठी विदेशातून पैसा येणे यांची स्वत: अन्वेषण यंत्रणांचे अधिकारी, पोलीस महानिरीक्षक अरुणकुमार, तसेच मौलवी उमर गौतम यांनी पुष्टी दिली आहे. यावर उत्तरप्रदेश सरकारने ‘राष्ट्रीय सुरक्षा कायदा’ लावण्याचा आदेश दिला आहे’, असे श्री. सुनील घनवट यांनी उत्तर देत शमशुद्दीन तांबोळी यांचा धर्मांधांना पाठीशी घालण्याचा प्रकार उघड केला.

लव्ह जिहाद अस्तित्वात नसल्याच्या विधानावर श्री. सुनील घनवट यांनी केलेला सडेतोड प्रतिवाद

शमशुद्दीन तांबोळी यांनी ‘लव्ह जिहादच्या संदर्भात बोलले जाते; पण आतापर्यंत अशा प्रकरणाचा एकही खटला न्यायालयात सिद्ध झालेला नाही’, असे सोयीस्कर विधान केले. याचा श्री. सुनील घनवट यांनी सडेतोड आणि निर्विवाद प्रतिवाद केला. ते म्हणाले, ‘‘देशात लव्ह जिहादची सहस्रो प्रकरणे समोर आली आहेत. केरळच्या साम्यवादी मुख्यमंत्र्यांनी लव्ह जिहाद असल्याचे मान्य केले आहे. राष्ट्रीय नेमबाज तारा सहगल यांनी ‘लव्ह जिहाद अस्तित्वात असून यात स्वत:चीही फसवणूक झाली’ असे उघडपणे म्हटले होते. तसेच देशातील गुजरात, उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश या राज्यांत ‘लव्ह जिहादविरोधी’ कायदा करण्यात आला आहे.’’

चर्चासत्राच्या आरंभी लव्ह जिहादचे अस्तित्व नाकारणारे शमशुद्दीन तांबोळी यांनी श्री. सुनील घनवट यांचा प्रतिवाद ऐकल्यानंतर ‘अशी एक-दोन प्रकरणे असतील. त्याचा मी निषेध करतो; पण तुम्ही सहस्रो प्रकरणे म्हणता आणि केवळ दोनच घटना सांगता’, असे वक्तव्य केले. (‘पडलो तरी नाक वर’ याप्रमाणे वर्तन करणारे शमशुद्दीन तांबोळी ! तांबोळी यांनी धर्मांधप्रेमाचा बुरखा दूर केला, तरच त्यांना समाजातील लव्ह जिहादचे दाहक वास्तव दिसेल ! – संपादक)

चर्चासत्रात श्री. सुनील घनवट यांच्या बाणेदारपणामुळे उघड झाला शमशुद्दीन तांबोळी यांचा दुटप्पीपणा !

चर्चासत्रात शमशुद्दीन तांबोळी धर्मांधांना एक प्रकारे पाठीशी घालत असल्याचे त्यांच्या वक्तव्यांतून दिसून येत होते. श्री. सुनील घनवट यांनी ‘जे चुकीचे आहे, ते चुकीचेच आहे. चुकीच्या गोष्टींचा तुम्ही कधी स्वत:हून आणि जाहीरपणे निषेध केला आहे का ?’, असे बाणेदारपणे म्हटले. यानंतर शमशुद्दीन यांनी किमान शाब्दिक निषेध नोंदवला. चर्चासत्राच्या शेवटी मात्र तांबोळी यांनी ‘जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही, तोपर्यंत आम्ही निषेध तरी का करावा ?’, असे म्हणत पुन्हा स्वत:चे मत पालटले.

(म्हणे) ‘धर्मांधतेच्या घटनांकडे धर्माच्या नाही, तर मानवतेच्या दृष्टीने पहायला हवे !’ – शमशुद्दीन तांबोळी

धर्मांध कारवाया करणारे केवळ विशिष्ट धर्मातील मूठभर लोक नाहीत. ‘घरवापसी’सारख्या घटनाही याचप्रमाणे (धर्मांतराप्रमाणे) आहेत. त्यामुळे अशा घटनांकडे धर्माच्या दृष्टीने न पहाता मानवतेच्या दृष्टीने पहायला हवे. (‘जिहाद’च्या नावाखाली चालणार्‍या कारवाया मानवतेच्या नाही, तर धर्माच्या दृष्टीकोनातून केल्या जातात. याविषयी तांबोळी यांना काय म्हणायचे आहे ? – संपादक)

टूलकिट म्हणजे काय ?

टूलकिट शेतकरी आंदोलनासाठी समर्थकांची संख्या कशा प्रकारे वाढवता येईल ? या मार्गदर्शक तत्त्वांची सूची आहे. आंदोलन करत असतांना काही अडचण आल्यास कुणाशी संपर्क करावा ? आंदोलनात काय करावे आणि काय करू नये ? या सर्व गोष्टी त्यात समजावून सांगण्यात आल्या आहेत.