पाश्‍चात्त्य विचारशैलीचा अंगीकार नाशाला कारणीभूत !

प.पू. आबा उपाध्ये

अती सुखभोग विनाशाला कारणीभूत ठरू शकतात !

‘सुखोपभोग आणि सुख-समाधान यात फरक आहे. सुख-समाधान हा परमेश्‍वरी संकेत आहे, तर सुखोपभोग हा दानव संकेत आहे.’

– प.पू. सदानंद स्वामी (प.पू. आबा उपाध्ये यांच्या माध्यमातून) (८.१.१९९८)

कलीच्या विळख्यातून बाहेर पडणाराच भगवंताला प्रिय !

‘त्या बिचार्‍या माणसाचा तरी काय दोष ? कलियुगानेच त्याला ग्रासून टाकले, तर तो बिचारा काय करणार ? ‘धडपड करण्याची ताकदच नाही’, असे म्हणण्यापेक्षा ताकद असूनही कलीच्या सान्निध्यातले विषारी वासनांचे व्यसन ज्याला सुखद वाटते, तो कशाला धडपड करील ? कलीच्या विळख्यातून बाहेर पडणाराच भगवंताच्या मांडीवर बसण्यास योग्य ठरतो आणि तोच माऊलीच्या मांडीचा सुखद आनंद घेऊ शकतो.’ – प.पू. सदानंद स्वामी

(प.पू. आबा उपाध्ये यांच्या माध्यमातून) (१५.२.१९९६)


परात्पर गुरु परशराम पांडे (महाराज)

सध्या मानव स्वार्थ, चढाओढ यांत सुख मानत आहे !

‘सृष्टीतील मानवेतर जिवांचे क्षणभंगूर जीवन असतांनाही ते आनंदाने जीवन कंठत असतात. मानव मात्र द्वेष, चढाओढ, स्वार्थ इत्यादी अहंकारामुळे दुःखी जीवन कंठत आहे आणि त्यातच फुशारकी अन् सुख मानत आहे.’ – (परात्पर गुरु) परशराम पांडे (महाराज) (२०.८.२०१८)