१० वी आणि १२ वीच्या परीक्षा ‘ऑनलाईन’ घ्या !

मुंबई आणि पुणे येथे विद्यार्थ्यांचे आंदोलन !

मुंबई – १० वी आणि १२ वीच्या अंतिम परीक्षा ‘ऑनलाईन’ घ्याव्यात, या मागणीसाठी २ एप्रिल या दिवशी मुंबईत शिवाजी पार्क, तर पुणे येथे उच्च माध्यमिक मंडळाच्या कार्यालयाच्या बाहेर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. परीक्षा ‘ऑफलाईन’ घेणार असाल, तर विद्यार्थ्यांचे दायित्व शिक्षणमंत्र्यांनी स्वीकारावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

मुंबईतील आंदोलनात ठाणे आणि नवी मुंबई येथीलही विद्यार्थी सहभागी झाले होते. मागील वर्षभरात अभ्यासक्रम, सराव परीक्षा या ‘ऑनलाईन’ झाल्यामुळे शालेय शुल्क परत करावे. तसेच सध्याच्या परीक्षेतील २ पेपरच्या कालावधीतील दिवसांचे अंतर वाढवावे. मार्च मासात १० सहस्रांहून अधिक लहान मुलांना कोरोनाची लागण झाली आहे, या गोष्टीचा विचार करून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळू नये. विद्यार्थ्यांच्या मागण्यांना शिक्षणमंत्र्यांनी लवकरात लवकर विचार करावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, अशी चेतावणी आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांनी दिली आहे.