(म्हणे) ‘भारत आणि पाकिस्तान यांनी भूतकाळ विसरून पुढे जाण्याची वेळ !’ – पाकचे सैन्यदलप्रमुख कमर बाजवा

भारताला भूतकाळच नाही, तर वर्तमानही विसरता येणार नाही. पाकने भूतकाळ विसरण्यास सांगण्यापेक्षा त्याने वर्तमान सुधारले पाहिजे. त्याने जिहादी आतंकवाद्यांच्या निर्मितीचे कारखाने बंद करून त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. तसेच त्याच्याकडून भारतात होणार्‍या आतंकवादी कारवाया रोखल्या पाहिजेत ! पाकव्याप्त काश्मीर भारताला परत दिला पाहिजे.

इस्लामाबाद (पाकिस्तान) – ‘भारत आणि पाकिस्तान यांनी भूतकाळ गाडून टाकून पुढे वाटचाल करण्याची वेळ आली आहे, असे आम्हाला वाटते’, असे विधान पाकचे सैन्यदलप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी केले आहे. ‘या दोन शेजारी देशांमध्ये शांतता प्रस्थापित झाल्यास दक्षिण आणि मध्य आशियातील क्षमता मोकळ्या करण्यास साहाय्य होईल. भारताला प्रामुख्याने काश्मीरमध्ये उपयुक्त वातावरण निर्माण करावे लागेल. अर्थपूर्ण संवाद होण्याचे दायित्व भारताचे आहे’, असेही ते म्हणाले. ‘इस्लामाबाद सुरक्षा संवादाच्या’ एका सत्राला संबोधित करतांना बाजवा बोलत होते.