(म्हणे) ‘भ्रष्टाचार हा कार्यपद्धतीचा भाग !’ – हेमंत नगराळे, पोलीस महासंचालक

अशी मानसिकता ठेवणारे उच्चपदस्थ पोलीस देशातील महत्त्वाच्या राज्यात असतील, तर देशातील भ्रष्टाचार कधीच न्यून होणार नाही ! अशा पोलिसांवर सरकारनेच तात्काळ कारवाई करणे आवश्यक !

हेमंत नगराळे

मुंबई – भ्रष्टाचार हा पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीचा (‘सिस्टिम’चा) भाग आहे. उलट पोलीस आणि महसूल विभागात कर्मचार्‍यांची संख्या अल्प असल्याने अन्य विभागांच्या तुलनेत येथे भ्रष्टाचार न्यूनच आहे, अशी मुक्ताफळे राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी उधळली आहेत. पोलीस जिमखान्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (‘भ्रष्टाचार हा शिष्टाचार झाला आहे’ असे म्हटले जाते. पोलीस महासंचालकांच्या वक्तव्यावरून त्याचीच प्रचीती येते ! हे ऐकून मुळापासून सडलेली घाणेरडी भ्रष्ट व्यवस्था पालटून रामराज्याची म्हणजेच हिंदु राष्ट्राची निर्मिती झाली पाहिजे, असे कुठल्याही देशभक्ताला वाटले, तर ते चूक नव्हे ! अशा भ्रष्ट पोलीस प्रशासनामुळेच आजवर लक्षावधी लोक न्यायापासून वंचित राहिले, सहस्रो हिंदूंवर अन्याय झाले, शेकडो गुन्हेगार मोकाट सुटले आणि कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत, असेच कुणालाही वाटेल ! – संपादक) कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना विभागात नोकरी देण्यात येणार आहे, तसेच पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचे अन्वेषण योग्य दिशेने चालू आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले. (मुळातच विश्‍वासार्हता गमावलेल्या प्रशासनाचे आणि भ्रष्ट व्यवस्थेचे अधिकारी असलेल्यांच्या वक्तव्यावर आता कोण विश्‍वास ठेवेल ? – संपादक)