(म्हणे) ‘भारताकडून लडाखमधील पँगाँग तलावाजवळील नैसर्गिक वातावरण नष्ट करण्याचा प्रयत्न !’

चीनच्या उलट्या बोंबा !

भारत नाही, तर चीन येथील वातावरण प्रदूषित करण्याचा प्रयत्न करत आहे. चीनने येथील भाग सैन्य छावणीमध्ये परावर्तित केला आहे. येथे त्याने बंकर आणि ‘रडार स्टेशन’ उभारले आहेत. तलावाच्या किनार्‍याने ‘ऑप्टिकल केबल’ घालण्यात आल्या आहेत. डिझेलपासून चालणार्‍या नौका तैनात केल्या आहेत. यामुळेच येथे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. असे असतांना चीनने भारतावर आरोप करणे, म्हणजे चोराच्या उलट्या बोंबाच होत !

बीजिंग (चीन) – भारत लडाखमधील १३४ कि.मी. लांब असणार्‍या पँगाँग तलावाजवळील शांतता आणि स्थिरता, तसेच येथील नैसर्गिक वातावरण नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप चीनचे सरकारी वर्तमानपत्र ‘ग्लोबल टाइम्स’च्या एका लेखात करण्यात आला आहे. संघर्षाच्या स्थितीमुळे गेल्या काही मासांपासून या तलावाजवळ भारत आणि चीन यांनी प्रत्येकी ५० सहस्र सैनिक तैनात केले आहेत.

या लेखात म्हटले आहे की, भारताने मोठ्या संख्येने येथे सैनिक तैनात केल्याने त्यांच्या उपस्थितीमुळे येथे रोगराई निर्माण होत आहे. चीन येथील नैसर्गिक वातावरण वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. चीन येथील कचरा दूर नेऊन टाकत आहे. चीनच्या भागात या तलावाचे पाणी स्वच्छ आहे.