कृषीविषयी सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जात मिळण्यासाठी ‘महा-डी.बी.टी. पोर्टल’वर ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करावा ! – दादाजी भुसे, कृषीमंत्री

कृषीमंत्री दादाजी भुसे

मुंबई – कृषीविषयक सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे मिळावा, यासाठी शेतकर्‍यांनी ३१ डिसेंबरपर्यंत ‘महा-डी.बी.टी. पोर्टल’वर ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करावा, असे आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.

ते म्हणाले, ‘‘यामध्ये अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. त्याद्वारे शेतकर्‍यांना त्यांच्या आवडीच्या योजनांची निवड करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍यांनी अर्ज स्वत:चा भ्रमणभाष क्रमांक आणि आधार कार्ड यांच्याशी संलग्न करणे आवश्यक आहे. ‘https://mahadbtmahait.gov.in/’ या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर ‘शेतकरी योजना’ हा पर्याय निवडावा. भ्रमणभाष, संगणक, भ्रमणसंगणक, ‘टॅबलेट’, सामुदायिक सेवा केंद्र (सी.एस्.सी.), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र आदींच्या माध्यमातून संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे.’’