राज्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गोव्यातील आर्चबिशपांचाही विरोध

समाज आणि पर्यावरण यांना धोकादायक ठरणार्‍या प्रकल्पांच्या विरोधात लोकांनी आवाज उठवला पाहिजे ! – आर्चबिशप फिलीप नेरी फेर्राव

अनेक प्रकल्पांना विरोध करतांना त्यात चर्चप्रणित संघटनांचा सहभाग असतो आणि ख्रिस्ती समाजाची संख्याही अधिक असते. याचे कारण यातून लक्षात येते. हिंदूंनी यातून शिकावे !

पणजी, ३ डिसेंबर (वार्ता.) – समाज आणि पर्यावरण यांना धोकादायक ठरणार्‍या प्रकल्पांच्या विरोधात लोकांनी आवाज उठवला पाहिजे. ‘मला त्याचे पडलेले नाही’, अशी वृत्ती सोडून लोकांनी पुढील पिढ्यांना हानीकारक असणार्‍या प्रकल्पांच्या विरोधात आवाज उठवावा, असे आवाहन गोव्याचे आर्चबिशप फिलीप नेरी फेर्राव यांनी केले. जुने गोवे येथे फेस्ताच्या निमित्ताने ‘शेर्माव’ (प्रवचन) सांगतांना त्यांनी हे आवाहन केले. राज्यातील रेल्वेमार्ग दुपदरीकरण, वीजवाहिनी प्रकल्प आदी महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना समाजातील काही घटकांचा तीव्र विरोध आहे. या प्रकल्पांमुळे राज्यात कोळशाची वाहतूक वाढून प्रदूषण होणार असल्याचे कारण पुढे करून या प्रकल्पांना विरोध दर्शवला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर आर्चबिशप फिलीप नेरी फेर्राव यांनी हे आवाहन केले आहे.

आर्चबिशप फिलीप नेरी फेर्राव पुढे म्हणाले, ‘‘आपल्या दृष्टीने निसर्ग महत्त्वाचा आहे आणि निसर्गाचे रक्षण करणे, हे प्रत्येकाचे दायित्व आहे. कोरोना महामारीचा फटका बसलेल्यांना सर्वांनी साहाय्य केले पाहिजे.’’ (नवीन ख्रिस्ती वर्षाच्या प्रारंभी होणारे ध्वनीप्रदूषण आणि फटाक्यांद्वारे होणारे वायूप्रदूषण रोखण्यासाठी आर्चबिशप यांनी या गोष्टींवर बंदी घालण्याचे आवाहन ख्रिस्ती समाजाला करावे. यामुळेही पर्यावरण रक्षण होईल ! – संपादक)