तीन दिवसांत वीजदेयक सवलतीचा निर्णय न घेतल्यास मंत्रालयात आंदोलन करणार ! – अतुल भातखळकर, भाजप

मुंबई – महाविकास आघाडी सरकारने येत्या तीन दिवसांत वीजदेयकांच्या सवलतीचा निर्णय न घेतल्यास मंत्रालयात घुसून आंदोलन करू, अशी चेतावणी भाजपचे मुंबई प्रभारी आणि कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडी सरकारला दिली आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने मुंबई येथील महावितरणच्या प्रकाशगड कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या वेळी अतुल भातखळकर बोलत होते. या मोर्च्यात महिला कार्यकर्त्या आणि पोलीस यांच्यात खडाजंगी झाली. भाजपचे नेते या मोर्च्यात सहभागी झाले होते.

ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारमधील तीन पक्षांमध्ये असलेला असमन्वय पुराव्यांसह सर्वांसमोर मांडला. राज्याच्या ऊर्जा मंत्र्यांनी वाढीव वीजदेयकात सवलत देण्याचे वारंवार आश्‍वासन दिले; परंतु हे खाते काँग्रेस पक्षाकडे असल्यामुळे राज्यातील वीजग्राहकांना ही सवलत देण्यासाठी आवश्यक असणारा निधी देण्यास मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांनी नकार दिला आहे, असा आरोप भातखळकर यांनी या वेळी केला आहे.

श्रेयवादाच्या लढाईत राज्यातील जनतेला वेठीस धरण्याचे दु:ष्पाप हे महाविकास आघाडी सरकार करीत आहे. जोपर्यंत राज्यातील जनतेला ३०० युनिटपर्यंतची सवलत आणि वाढीव वीजदेयकातून दिलासा मिळणार नाही, तोपर्यंत भारतीय जनता पक्षाचे हे आंदोलन असेच चालू राहील, असे भातखळकर यांनी या वेळी सांगितले.