गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍यांवर सरकारने घातलेले निर्बंध योग्य ! – उच्च न्यायालय


मुंबई – कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍यांवर सरकारने घातलेले निर्बंध योग्य असून त्यातून त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत नाही, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या नागरिकांसाठी घालण्यात आलेल्या निर्बंधांवरून सरकारच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिकाही प्रविष्ट करण्यात आली होती. या याचिकेवर झालेल्या सुनावणीत न्यायालयाने हा दावा फेटाळून लावला. सरकारने घातलेले निर्बंध हे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी, तसेच कोकणात गेल्यावर नागरिकांना कुठल्याही प्रकारच्या अडचणींना सामोरे जाऊ नये, यांसाठी घातले आहेत, असे न्यायमूर्ती के.के. तातेड आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपिठाने स्पष्ट केले.