सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाकडून ‘सक्षम महिला, समृद्ध महाराष्ट्र’ दिंडी !

‘राष्ट्रीय सेवा योजना’ उपक्रम

पुणे – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या ‘राष्ट्रीय सेवा योजना’ (एन्.एस्.एस्.) विभागाकडून यंदा ‘स्वच्छ वारी, स्वस्थ वारी, निर्मल वारी, हरित वारी’ या अभियानांतर्गत ‘सक्षम महिला, समृद्ध महाराष्ट्र’ या विषयावर आधारित राज्यस्तरीय दिंडीचे आयोजन केले आहे. ही दिंडी ९ ते २५ जुलै या कालावधीत राबवण्यात येणार आहे. मागील २२ वर्षांपासून पुणे विद्यापिठाच्या एन्.एस्.एस्.कडून आषाढी वारीत विविध सामाजिक उपक्रमांची अखंड परंपरा चालू असल्याची माहिती राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक (अतिरिक्त कार्यभार) डॉ. गणेश भामे यांनी दिली.

या राज्यस्तरीय दिंडीत ‘सक्षम महिला, समृद्ध महाराष्ट्र’ या संकल्पनेवर जनजागृती कार्यक्रम, पथनाट्य सादरीकरण, वारीत सहभागी महिलांच्या सहभागाचे सर्वेक्षण, पालखीतळ आणि वारीमार्ग स्वच्छता अभियान, वृक्षारोपण आणि ज्येष्ठ साहित्यिक द.मा. मिरासदार यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘कथाकथना’चे विशेष कार्यक्रम आयोजित केले आहेत