हनुमानगढी मंदिराच्या पायर्‍यांवर नमाजपठण करण्याचे पाप समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्या सरकारांनी केले ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

अयोध्या (उत्तरप्रदेश) – प्रदीर्घ काळ अयोध्या विकासापासून दूर राहिली. समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्या सरकारांनी हनुमानगढी मंदिराच्या पायर्‍यांवर नमाजपठण घडवून आणण्याचे पाप केले. देहलीच्या जामा मशिदीत कधी कुणी हनुमानचालिसाचे पठण करू शकतो का ?, असा प्रश्न उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बिकापूर येथील एका कार्यक्रमात केला.

श्रीराम आणि श्री हनुमान यांच्या आशीर्वादामुळे सर्व कामे आपोआप होतात !

योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले की, अयोध्या आज विकास, समृद्धी आणि वैभव यांकडे वाटचाल करत आहे. जर हेतू स्वच्छ असेल, तर विकास आपोआप होतो. प्रभु श्रीराम यांची कृपा आणि हनुमानजींचा आशीर्वाद असेल, तर अयोध्येची सर्व कामे आपोआपच होतात, हे आज अयोध्येत दिसून येत आहे.

२ नगर पंचायतींचे नाव पालटले

या वेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी २ महत्त्वाच्या घोषणा केल्या. यात त्यांनी ‘खिरौनी सोहावल’ नगर पंचायतीचे नाव पालटून ‘माँ ज्वालादेवी नगर पंचायत’ आणि ‘भरतकुंड-भदरसा’ नगर पंचायतीचे नाव पालटून ‘भरत नगर भरतकुंड’ करण्याची घोषणा केली.

संपादकीय भूमिका

यामुळेच उत्तरप्रदेशातील जनतेने दोघांनाही सत्ताच्युत केले आणि धडा शिकवला !