ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव !

विधान परिषदेत चुकीची माहिती दिल्याचे प्रकरण !

मुंबई, १० जुलै (वार्ता.) – विधान परिषदेत ३० जून या दिवशी लक्षवेधी सूचनेच्या वेळी चुकीची उत्तरे दिल्याप्रकरणी शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव सादर केला. या वेळी सभापती प्रा. राम शिंदे यांनी ‘प्रस्तावाविषयी मी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे खुलासा मागितलेला आहे. तो आल्यानंतर याविषयी निवेदन केले जाईल’, असे स्पष्ट केले.

आमदार बच्चू कडू म्हणाले की, लक्षवेधी सूचनेत उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर देतांना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी ‘मी कधीही चुकीचे उत्तर देत नाही’, असे वक्तव्य केले होते. त्या वेळी मी वारंवार सांगत होतो की, आपण चुकीचे उत्तर देत आहात. तरीही मंत्री गोरे यांनी चुकीचे उत्तर देऊन सभागृहाची दिशाभूल केली. ‘संगणक परिचारिकाला जे पैसे मिळतात, ते त्याला ‘कमिशन’ म्हणून मिळते’, असे चुकीचे उत्तर त्यांनी दिले. प्रत्यक्षात परिचारिकाला असे ‘कमिशन’ मिळत नाही. त्याविषयी माझ्याकडे पुरावे आहेत. ‘८४ कोटी रुपये संबंधित आस्थापनाला न देता ते संगणक परिचारिकांना द्यायला हवेत’, असे त्यांनी सांगितले. त्या वेळीही त्यांनी खोटे आणि चुकीचे उत्तर दिलेले आहे. ग्रामविकास मंत्र्यांनी या सभागृहाचा हक्कभंग केलेला आहे. चुकीचे उत्तर येऊ नये, यासाठी याविषयी हक्कभंगाचा प्रस्ताव विशेष हक्कभंग समितीकडे पाठवण्यात यावा, अशी त्यांनी विनंती केली.