राष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा न करता विरोधकांकडून शिव्याशाप आणि खोटे आरोप ! – एकनाथ शिंदे

मुंबई, १० जुलै (वार्ता.) – अधिवेशन हे जनता आणि राज्य यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी असते; परंतु सध्याचा विरोधी पक्ष गोंधळलेला आणि भरकटलेला आहे. सभागृहात विधायक चर्चा करण्याऐवजी विरोधक केवळ पायर्‍यांवर आणि प्रसारमाध्यमांसमोर उभे राहून शिव्याशाप देण्याचे अन् खोटे आरोप करण्याचे हिणकस राजकारण करीत आहेत, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत केली. ‘आमच्याकडे बहुमत असले, तरी लोकशाहीत आम्ही विरोधकांचे ऐकून घेण्यास सिद्ध आहोत; मात्र त्यांच्याकडे केवळ विरोधासाठी विरोध करण्यापलीकडे काहीही नाही’, असेही त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की,

१. गेल्या २५ वर्षांत अल्प कालावधीत अतीवृष्टी होण्याचे प्रमाण १५ टक्क्यांनी वाढले आहे. मुंबईत अवघ्या एका आठवड्यात २५ टक्के पाऊस पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले; परंतु सरकारने तत्परतेने संकट निवारणासाठी प्रशासन सज्ज ठेवले आहे.

२. निसर्गाच्या संकटात राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क शेतकर्‍यांचा आहे. त्यांना वार्‍यावर सोडले जाणार नाही.

३. आषाढी एकादशीनिमित्त लाडक्या वारकर्‍यांच्या वाटेतील विघ्ने दूर करण्यासाठी शासन कटीबद्ध आहे.

४. पंढरपूर येथे चंद्रभागेच्या पटांगणात चोख नियोजन करण्यात आले असून प्रथमच अतीदक्षता विभाग सिद्ध केला आहे.