मे मासात धरणांमध्ये पाणी साठवून ठेवण्याची उपाययोजना करणार ! – सुभाष शिरोडकर, जलस्रोतमंत्री

ऑगस्टपासून अनधिकृत कूपनलिकांना (बोअलवेलना) ठोकणार टाळे

प्रतिकात्मक चित्र

पणजी, १ जुलै (वार्ता.) – हंगामी पाऊस विलंबाने आला, तरीही पाण्याचा तुटवडा भासू नये, यासाठी मे मासात धरणांमध्ये पाणी साठवून ठेवण्याची तजवीज करण्यात येणार आहे. यासाठी खास योजना सिद्ध केली जाणार आहे, तसेच ऑगस्टपासून अनधिकृत कूपनलिकांना टाळे ठोकण्यात येणार आहे, अशी चेतावणी जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली.

ते पुढे म्हणाले, ‘‘या वर्षी पाऊस विलंबाने आला. यामुळे साळावली, अंजुणा यांसह सर्व धरणांमधील पाण्याची पातळी उणावली. पाऊस न आल्यास पाण्याची टंचाई निर्माण होईल, अशी भीती निर्माण झाली. आता पावसाला प्रारंभ झाल्याने धरणाचे पाणी वाढत आहे. यापुढेही अशी स्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. यासाठी मे मासानंतर पुढील २-३ मास धरणात पाणी साठवून ठेवण्यासाठी खास उपाययोजना केली जाणार आहे. चिंबल येथील अनधिकृत कूपनलिकांवर कारवाई करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. ऑगस्टपासून राज्यातील सर्व अनधिकृत कूपनलिकांना टाळे ठोकले जाणार आहे.’’