POK Protests : पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानचा भाग नसून जर दडपशाही थांबली नाही, तर भारतासमवेत जाऊ !

पाकव्याप्त काश्मीरमधील आंदोलनकर्त्यांची पाकला चेतावणी

पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन करताना नागरिक

रावलकोट (पाकव्याप्त काश्मीर) – पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानचा नाही. आम्हाला पाकिस्तानची आवश्यकता नाही, उलट पाकिस्तानला त्याच्या अस्तित्वासाठी पाकव्याप्त काश्मीरची आवश्यकता आहे. जर सध्याची परिस्थिती अशीच राहिली, तर स्थानिक लोक भारतासमवेत जातील. पाकव्याप्त काश्मीरच्या सीमा उघड्या होऊ शकतात आणि असे झाले, तर पाकिस्तानला पाकव्याप्त काश्मीरच्या लोकांना थांबण्यासाठी भीक मागावी लागेल, अशी चेतावणी पाकव्याप्त काश्मीरमधील  नागरी उठावाचे नेतृत्व करत असलेले नागरी हक्क कार्यकर्ते सरदार अमन खान यांनी ईदगाह मैदानावर जमलेल्या जनसमुदायासमोर दिली. पाकिस्तानच्या प्रशासकीय दडपशाहीच्या विरोधात पाकव्याप्त काश्मीरमधील रावलकोटमधील ईदगाह मैदानावर सहस्रो लोक २२ दिवसांपासून आंदोलन करत आहेत. महागाई, आर्थिक संकट, जीवनावश्यक अन्नपदार्थ आणि रेशन यांच्या पुरवठ्यावरील बंदी अन् प्रशासकीय अपयश यांमुळे संतापलेले नागरिक हे आंदोलन करत आहेत.

स्वातंत्र्य मिळेपर्यंत नागरी उठाव थांबणार नाही !

पाकव्याप्त काश्मीरमध्ये अनेक दशकांपासून चालत आलेली राजकीय दडपशाही, महागाई आणि प्रशासकीय दुर्लक्ष यांविरोधात ३८ कलमी मागण्यांसाठी नागरी उठाव चालू झाला आहे. ते पाकिस्तानपासून स्वातंत्र्याची मागणी करत आहेत. येथील आंदोलनाची माहिती जगासमोर येऊ नये, यासाठी पाकिस्तानी सरकारने ५ जूनपासून या भागात इंटरनेट सेवा बंद केली आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील स्थलांतरित लोक या उठावाच्या समर्थनार्थ वेगवेगळ्या देशांमधील पाकिस्तानी दूतावास आणि उच्चायोग यांच्याबाहेर निदर्शने करत आहेत. दुसरीकडे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले आहे की, मुझफ्फराबादसह सर्व भागांना पाकिस्तानी नियंत्रणापासून स्वातंत्र्य मिळेपर्यंत हा उठाव थांबणार नाही.

विरोधी नेत्यांना जाण्यापासून रोखले !

पाकिस्तानी सरकारने विरोधी नेत्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाण्यापासून रोखले. ‘जम्मू-काश्मीर जॉइंट अवामी ॲक्शन कमिटी’ने यासाठी पाकिस्तानी अधिकार्‍यांवर कठोर टीका केली आहे. पाकचे हे पाऊल म्हणजे लोकशाही अधिकार आणि राजकीय मतभेद दाबण्याच्या कारवाईचा आणखी एक पुरावा आहे, असे त्यांनी म्हटले आहे.