चीनच्या सैन्यासमवेत प्रतिवर्षी १ सहस्र १०० वेळा होतो सामना ! – General Upendra Dwivedi

मावळते सैन्यदलप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी दिली माहिती

जनरल उपेंद्र द्विवेदी

नवी देहली – भारत आणि चीन यांच्या सैन्यांमध्ये प्रतिवर्षी १ सहस्र १०० हून अधिक वेळा भूमीस्तरावरील चर्चा होतात, जेणेकरून सीमेवर कोणत्याही प्रकारचा अपसमज टाळता येईल. या सीमेवरील परिस्थिती स्थिर असली, तरी संवेदनशील आहे आणि भारतीय सैन्य कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे, अशी माहिती मावळते सैन्यदलप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी दिली. त्यांनी हेही सांगितले की, भारतीय सैन्य वेगाने सैनिकी रणनीती पालटत असून भविष्यातील युद्धांसाठी स्वतःला सिद्ध करत आहे.

जनरल उपेंद्र द्विवेदी पुढे म्हणाले की, आत्मनिर्भरता आता केवळ एक धोरण राहिले नसून ती राष्ट्रीय सुरक्षेची पायाभूत आवश्यकता बनली आहे. युद्ध किंवा संकट या  परिस्थितीत देशाने स्वतःची शस्त्रास्त्र, दारुगोळा आणि सैनिकी  तंत्रज्ञान यांसाठी इतरांवर अवलंबून राहू नये. भारतीय सैन्य स्वदेशी तंत्रज्ञान, ड्रोन, इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली, दळणवळण ‘नेटवर्क’ (जाळे) आणि एआय (कृत्रिम बुद्धीमत्ता) यांवर आधारित प्रणाली वेगाने स्वीकारण्याच्या दिशेने काम करत आहे.