‘संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्या’च्या देहूरोड मार्गावर २९ गतीरोधक !

जागोजागी खड्डे, पालखी मार्गाची दुरवस्था !

जगद्गुरु संत तुकाराम महाराज  पालखी 

देहू (जिल्हा पुणे) – आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा ७ जुलैला देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. वारकर्‍यांच्या सोयीसाठी पालखी मार्ग प्रशस्त आणि व्यवस्थित असणे आवश्यक आहे; मात्र पालखी मार्गावरील परंडवाल चौक, माळवाडीकडे जाणारे वळण, माळवाडीतील समर्थनगर परिसर, झेंडे मळ्याजवळील ‘क्रॉसिंग’, अशोकनगर परिसर आणि देहू फाटा चौक येथे रस्त्यावर खड्डे पडले आहेत. निगडीतील भक्तीशक्ती चौकात उड्डाणपुलाजवळून सेवा रस्त्याकडे जाणार्‍या मार्गालगत अवजड वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. या परिसरातील रस्त्याचीही दुरवस्था झाली आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा मार्गावरील देहू ते देहूरोड या अवघ्या ६ कि.मी.च्या अंतरात २९ गतीरोधक आहेत.

देहूतील पुलाचे काम संथगतीने; प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष !

पालखी सोहळा चालू होण्यापूर्वी देहू नगरपंचायतीच्या हद्दीतील ‘परंडवाल चौक’ येथील पुलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते; मात्र जून महिना अर्धा संपत आला, तरी हे काम अपूर्णच आहे. एप्रिल २०२६ पर्यंत पूर्ण होणारे हे काम अद्याप रखडलेले असून वारीच्या तोंडावर केवळ रस्त्याची मलमपट्टी केली जात असल्याचे चित्र आहे. (आषाढी वारीचा दिनांक निश्चित असतो, तरीही प्रशासनाला ऐन वारीच्या तोंडावरच रस्त्यांची कामे का आठवतात ? देहू येथील पुलाचे काम एप्रिल २०२६ मध्येच पूर्ण होणे अपेक्षित असतांना ते अद्याप अपूर्ण रहाणे, हा प्रशासनाचा ढिसाळपणा आणि वारकर्‍यांविषयीची अनास्था आहे. ६ कि.मी.च्या पालखी मार्गावर २९ गतीरोधक आणि खड्ड्यांचे साम्राज्य असणे, हे प्रशासनासाठी लज्जास्पद नव्हे का ? – संपादक)