यावर्षी देशात ९०, तर महाराष्ट्रात ९८ टक्के पावसाची शक्यता !

पुणे – देशाची अर्थव्यवस्था आणि शेतीचा कणा असलेला नैऋत्य मान्सून येत्या २ ते ३ दिवसांत केरळच्या मार्गे भारतात प्रवेश करणार आहे. ज्येष्ठ कृषी हवामान तज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांच्या अंदाजानुसार राज्यात ९८ टक्के पाऊस होणार असला, तरी त्याचे वितरण अत्यंत असमान राहील आणि पावसाचे मोठे खंड पडू शकतात. जुलैच्या उत्तरार्धापासून ते सप्टेंबर या काळात पावसाचे प्रमाण चांगले राहील; मात्र धुळे, सोलापूर, जळगाव, चंद्रपूर, भंडारा, कोल्हापूर, अहिल्यानगर आणि पुण्याच्या पूर्व भागात पावसाची ओढ रहाण्याची शक्यता आहे.

पावसाच्या या मोठ्या खंडांमुळे छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेले जायकवाडी धरण यंदा पूर्ण क्षमतेने भरेल कि नाही याविषयी तज्ञांमध्ये साशंकता आहे. निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेतकर्‍यांनी आतापासूनच पेरणीचे आणि पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.