गुन्हेगाराच्या अटकेनंतर झालेल्या दगडफेकीत २ वनरक्षक घायाळ !

मेळघाटात वन्य प्राण्यांना विषाद्वारे मारण्याचा प्रकार !

मेळघाट प्रकल्पांत प्राण्यांना विषबाधा करून मारले

अमरावती – मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत धारणी तालुक्यातील चौराकुंड वनपरिक्षेत्रात अरण्यातील नैसर्गिक पाणवठ्यात युरिया (विष) कालवून ४ रानगवे, २ भेकड आणि मोर यांच्यासह अनेक निष्पाप पक्ष्यांना ठार मारण्यात आले. या प्रकरणी वनविभागाने कारवाई करत गावातील मुख्य आरोपीला अटक केली, तर अन्य ६ जण पसार आहेत. याचाच राग मनात धरून ३० मेच्या रात्री अटक केलेल्या आरोपीचे नातेवाईक आणि काही ग्रामस्थ यांनी चौकशी करणारे वनविभागाचे अधिकारी अन् कर्मचारी यांच्यावर दगडफेक केली. यात एक महिला आणि एक पुरुष असे २ वनरक्षक गंभीर घायाळ झाले. २२ मे या दिवशी प्राण्यांना विषबाधा करून मारल्याचे उघडकीस आले होते.

धारणीचे पोलीस निरीक्षक अवतारसिंह चौहान म्हणाले की, वन कर्मचार्‍यांवर दगडफेक करण्यासाठी जाणीवपूर्वक अल्पवयीन मुलांचा वापर करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दगडफेक करणार्‍या एका युवकाला अटक केली. सद्यःस्थितीत गावात धारणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून घायाळ वनरक्षकांवर रुग्णालयात उपचार चालू आहेत.

संपादकीय भूमिका

  • यावरून गुन्हेगारांना कायद्याचा जराही धाक नसल्याचे उघड होते. अशांवर जरब बसेल, अशी कारवाई पोलिसांनी करणे आवश्यक आहे !
  • वन्य प्राण्यांच्या जिवावर उठलेल्यांविषयी प्राणीप्रेमी संघटना गप्प का ?