जर कुणी राष्ट्र आणि समाज यांच्यासाठी धोकादायक बनले, तर अहिंसा नाही, हिंसा आवश्यक ठरते ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – अहिंसा हे मानवी जीवनाचे मार्गदर्शक तत्त्व असले पाहिजे; परंतु जेव्हा एखादी व्यक्ती राष्ट्र आणि समाज यांसाठी धोकादायक ठरते, तेव्हा  अहिंसा चालत नाही. अशा परिस्थितीत हिंसा आवश्यक ठरते, असे विधान उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येथे एका कार्यक्रमात केले. या वेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते.

योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले की, सुरक्षित वातावरणातच विकास फुलू शकतो. देशाची शक्तीच जगातील तिचे स्थान ठरवते. जेव्हा आपण सुरक्षा आघाडीवर भक्कम  असू, तेव्हाच जग आपल्याशी मैत्री करेल. जर तुम्ही दुर्बल असाल, तर कुणीही तुमच्यासमोर नमत नाही. देशाच्या शत्रूंशी सामना करतांना देशाच्या सशस्त्र दलांच्या कृतींमध्ये हे तत्त्व दिसून येते. ज्याप्रमाणे सशस्त्र दल सर्व परिस्थितींमध्ये देशाच्या सीमांचे रक्षण करतात, त्याचप्रमाणे देशाचे रक्षण करणार्‍या सैनिकांचा सन्मान करणे आणि त्यांचा आदर करणे हे नागरिकांचेही दायित्व आहे.

जर परधर्म आपल्या स्वधर्माशी सहिष्णुतेने वागत नसेल, तर… !

ज्याप्रमाणे राष्ट्रासंदर्भात योगी आदित्यनाथ यांनी वक्तव्य केले, तसेच वक्तव्य अनेक दशकांआधी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी धर्मासंदर्भात केले होते. भारत राष्ट्र आणि हिंदु धर्म यांच्यात अद्वैत असल्याने त्यांचे वक्तव्य आजही तंतोतंत लागू पडते. ते म्हणाले होते, ‘परधर्म ज्या वेळी आपल्या स्वधर्माशी सहिष्णुतेने वागणारा असतो, त्या वेळी परधर्माशी आपण सहिष्णुतेने वागणे, हा सद्गुण ठरू शकतो. तथापि जो परधर्म आपल्या स्वधर्माशी सहिष्णुतेने वागत नाही, अशा परधर्मास परधर्मसहिष्णुतेची व्याख्या लागू पडत नाही !’