‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती’तील गैरव्यवहारांवर कारवाई न झाल्यास मुंबई उच्च न्यायालयात दाद मागू ! – प्रसाद मोहिते, क्षत्रिय मराठा रियासत फाऊंडेशन

 

कोल्हापूर, २९ मे (वार्ता.) – वर्ष २०१७ ते २०२१ या कालावधीत ‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती’चे तत्कालीन समितीचे अधिकारी, पदाधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार केला होता. या संदर्भात तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांनी केलेल्या चौकशीच्या अनुषंगाने केलेल्या अनियमिततेच्या विरोधात कारवाईचा प्रस्ताव सिद्ध केला आणि दोषारोपपत्र सिद्ध केले. हे पत्र त्यांनी विधी आणि न्याय विभागाकडे कारवाईसाठी पाठवले. या संदर्भात विधी आणि न्याय विभागाशी आम्ही पत्रव्यवहार केला असता त्यांनी यातील कारवाई अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले. सध्या यावर पुढे कोणतीच कारवाई होतांना दिसत नाही. तरी या संदर्भात विधी आणि न्याय विभागाकडून कोणतीच कारवाई न झाल्यास आम्ही मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत, अशी चेतावणी ‘क्षत्रिय मराठा रियासत फाऊंडेशन’चे प्रसाद मोहिते यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी सौरभ पोवार, तसेच विपुल घाटगे उपस्थित होते.

१. भ्रष्टाचाराच्या संदर्भात माहिती अधिकारात गेली ५ वर्षे आम्ही पुरावे गोळा केले असून यावर शासनाने कोणतीच कारवाई न केल्यास ही कागदपत्रे घेऊन आम्ही मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट करणार आहोत.

२. या अनियमितेत श्री महालक्ष्मीदेवीला अर्पण करण्यात आलेल्या ५ सहस्र साड्यांचा हिशोब नसणे, जनावरांसाठी देण्यात आलेल्या जीवनसत्त्वांचा हिशोब नसणे, महापुराच्या काळात भांडी वाटणे यांसाठी विधी आणि न्याय विभागाची अनुमती न घेणे, देवस्थान समितीची स्वत:ची जागा असतांना भाड्याची जागा घेण्यासाठी उधळपट्टी करणे, मोजणी करण्यासाठी खासगी आस्थापनास ७ कोटी रुपयांची निविदा काढणे यांसह अनेक गोष्टींचा समावेश आहे.

३. या संदर्भात हिंदुत्वनिष्ठ शासनाने ‘एक हिंदु म्हणून हिंदूंच्या मंदिरांना न्याय मिळवून द्यावा’, अशी आमची सरकारकडे मागणी आहे.