नीट परीक्षा रहित झाल्याच्या धक्क्यातून लातूरच्या विद्यार्थिनीची आत्महत्या !

नीट प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकरण

लातूर – वैद्यकीय प्रवेशासाठीची ‘नीट-यूजी’ परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीच्या वादामुळे रहित झाल्याने निर्माण झालेल्या तीव्र मानसिक तणावातून लातूर जिल्ह्यातील गोंदेगाव येथील विद्यार्थिनी कु. मैथिली अशोक सोनवणे (वय १८ वर्षे) हिने रहात्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. तिचे आधुनिक वैद्य होण्याचे स्वप्न होते. मुलांच्या वाढत्या आत्महत्यांमुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण असून विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता धैर्याने परिस्थितीला सामोरे जावे, असे आवाहन तज्ञांनी केले आहे.

३ मे या दिवशी झालेली परीक्षा उत्तम गेल्यानंतर सरकारी महाविद्यालयात प्रवेश मिळेल, असा मैथिलीला विश्वास होता; मात्र परीक्षा रहित होऊन २१ जून या दिवशी होणार्‍या फेरपरीक्षेचा मानसिक दबाव आणि वाढता तणाव सहन न झाल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले. गातेगाव पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात् मृत्यूची नोंद केली आहे.

देशभरात १२ दिवसांत ६ विद्यार्थ्यांचा अंत !

नीट परीक्षेच्या अनिश्चिततेमुळे आणि वर्षभराचे कष्ट पाण्यात गेल्याच्या नैराश्येतून १३ ते २५ मेच्या कालावधीत देशात ६ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे.

देशात राजस्थानचा प्रदीप मेघवाल (वय २२ वर्षे, सीकर), उत्तरप्रदेशचा रितिक मिश्रा (वय २१ वर्षे, लखीमपूर खेरी), देहलीची कु. अंशिका पांडे (वय २० वर्षे, आझादपूर), गोवा (मडगाव) आणि कर्नाटकातील प्रत्येकी एका १७ वर्षीय परीक्षार्थीने मानसिक दबावापोटी आत्महत्या केली आहे.

संपादकीय भूमिका

मानसिक ताणाला सामोरे जाण्यासाठी मुलांना धर्मशिक्षण देऊन त्यांचे मनोबल वाढवणे आवश्यक !