Tamil Nadu Crime : तमिळनाडूत ३ सहस्र २४६ गुन्हेगार आणि ४१९ अमली पदार्थ तस्कर यांना अटक !

  • मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या आदेशानंतर अवघ्या ३ दिवसांत व्यापक कारवाई

  • १ कोटी ४३ लाख रुपयांचे अमली पदार्थही केले जप्त !

AI निर्मित चित्र

चेन्नई (तमिळनाडू) – अमली पदार्थ तस्करीच्या विरोधात नवनिर्वाचित मुख्यमंत्री जोसेफ विजय यांनी कारवाईचे आदेश दिले. यानंतर तमिळनाडू पोलिसांनी अवघ्या ३ दिवसांत ३ सहस्र २४६ गुन्हेगार, तसेच ४१९ अमली पदार्थ तस्कर यांना अटक केली. या मोहिमेत १५ सहस्र ३४९ लोकांची तपासणी करण्यात आली. यात १२ सहस्र ६५० अट्टल गुन्हेगारांचा समावेश होता. यांपैकी ३ सहस्र २४६ लोकांना पुढील चौकशीसाठी अटक करण्यात आली.

अमली पदार्थ कायद्यांतर्गत अमली पदार्थांच्या विरोधात कारवाई करत पोलिसांनी २९४ गुन्हे नोंदवले. २६८ किलोग्राम गांजा आणि २ सहस्र ४७६ अमली गोळ्या जप्त केल्या. त्याचे अनुमानित मूल्य १ कोटी ४३ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ४८ घंट्याच्या आत जोसेफ विजय यांनी मोठे निर्णय घेतले. यातच राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात अनुमाने ६५ अमली पदार्थविरोधी कृती दलांची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

संपादकीय भूमिका

  • मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या आदेशानंतरच एवढी मोठी कारवाई झाली. याचा अर्थ पोलिसांना अमली पदार्थ तस्करांची माहिती ठाऊक होतीच; परंतु याआधी अशी व्यापक कारवाई करण्यात आली नाही. याचा अर्थ अमली पदार्थांचा व्यवसाय पोलिसांच्या संगनमताने चालू असतो, असे समजायचे का ?
  • सरकारला शक्य असेल, तर अशा प्रकारे गुन्हेगारी काही दिवसांत संपुष्टात आणता येऊ शकते; मात्र कोणतेही सरकार असे करत नाही, यातून ते गुन्हेगारांना पाठीशी घालून आर्थिक लाभ करून घेते, असेच जनतेला वाटते !