१ कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक झालेली ‘स्पीड बोट’ पोलिस ताफ्यात दाखल !

रत्नागिरीच्या सागरी सुरक्षेला बळ

रत्नागिरी – जिल्ह्याला लाभलेल्या विस्तीर्ण आणि संवेदनशील समुद्रकिनार्‍याची सुरक्षा अधिक भक्कम आणि वेगवान करण्यासाठी जिल्हा पोलिस दलाच्या ताफ्यात विशेष ‘स्पीड बोट’ दाखल झाली आहे. मूळच्या जुन्या बोटीची १ कोटी रुपये खर्च करून अत्याधुनिक डागडुजी करण्यात आली असून ही बोट नव्या जोमाने सागरी गस्तीसाठी सज्ज झाली आहे.

१. रत्नागिरी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलिस अधीक्षक बी.बी. महामुनी यांच्या हस्ते या अत्याधुनिक स्पीड बोटीचे शास्त्रोक्त पूजन करून ती अधिकृतपणे पोलिस सेवेत समाविष्ट करण्यात आली.

२. या नव्या प्रणालीमुळे अथांग समुद्रात पोलिसांना गस्त घालणे अधिक सोयीचे आणि वेगवान होणार आहे.

३. कोकण किनारपट्टीच्या दृष्टीने सागरी सुरक्षेचे सूत्र नेहमीच संवेदनशील राहिले आहे. हेच गांभीर्य ओळखून या बोटीचे आधुनिकीकरण करण्यात आले.

४. या स्पीड बोटीमध्ये अनेक आधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षा यंत्रणा बसवण्यात आल्या आहेत. यामुळे संशयास्पद हालचालींवर बारीक लक्ष ठेवणे आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने साहाय्य पोचवणे पोलिसांना शक्य होईल.

५. या विशेष उपक्रमामुळे रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाची सागरी सुरक्षा यंत्रणा अधिक सज्ज झाली असून किनारपट्टीवरील नागरिक आणि मासेमार यांच्या सुरक्षेचे वातावरण निर्माण झाले आहे