दूषित पाणीपुरवठ्यावरून आम आदमी पक्षाची पाणीपुरवठा विभागाकडे विचारणा !

दूषित पाणीपुरवठा तात्काळ बंद करावा, पाण्याची प्रयोगशाळेत पडताळणी करावी, नागरिकांना स्वच्छ पाणी द्यावे आणि संबंधितांवर कारवाई करावी, अशा मागण्या आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आल्या.

प्रतिकात्मक चित्र

सोलापूर – येथील शहरातील अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून पिवळसर आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने आम आदमी पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांकडे याविषयी विचारणा केली. नागरिकांच्या घरात येणारे दूषित पाणी बाटलीत भरून अधिकार्‍यांच्या कार्यालयात नेण्यात आले. ‘हेच पाणी नागरिक प्रतिदिन पित आहेत, आपणही पिऊन पहा’, अशी मागणी पदाधिकार्‍यांनी केली. त्यानंतर संबंधित अधिकार्‍यांनी त्या पाण्याचा घोट घेतला; मात्र त्यांनी ते पाणी थुंकल्याचे आम आदमी पक्षाकडून सांगण्यात आले.

दूषित पाण्यामुळे नागरिकांना उलट्या, जुलाब आणि पोटदुखी यांसारखे त्रास होत असल्याचेही त्यांनी सांगितले. दूषित पाणीपुरवठा तात्काळ बंद करावा, पाण्याची प्रयोगशाळेत पडताळणी करावी, नागरिकांना स्वच्छ पाणी द्यावे आणि संबंधितांवर कारवाई करावी, अशा मागण्या आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आल्या. (अशा मागण्या का कराव्या लागतात ? प्रशासनातील अधिकार्‍यांना ते लक्षात येत नाही का ? – संपादक)