एस्.टी.ची १ कोटी १६ लाख रुपयांची उत्पन्नवाढ ! – अभय देशमुख, एस्.टी. विभाग नियंत्रक, कोल्हापूर

कोल्हापूर – राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाला १ ते १३ मेपर्यंत उन्हाळी हंगामात गतवर्षीच्या तुलनेत १ कोटी १६ लाख रुपयांची उत्पन्नवाढ मिळाली आहे. यात प्रामुख्याने मुंबई, पुणे, परळ, बोरीवली, सोलापूर, अक्कलकोट, ठाणे येथील शहरांमध्ये अधिकची प्रवासी वाहतूक करण्यात आली. यापुढील काळात सर्व गाड्या या प्रत्यक्ष आगारात खिडकीवर, तसेच ‘भ्रमणभाष ॲप’द्वारेही आरक्षणासाठी उपलब्ध आहेत, अशी माहिती एस्.टी.चे कोल्हापूर विभाग नियंत्रक अभय देशमुख यांनी दिली.

१. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी घोषणा केल्याप्रमाणे येणार्‍या काळात कोल्हापूर विभागासाठी १२० अधिकच्या गाड्या टप्प्याटप्याने प्राप्त होतील. यामुळे अधिक चांगल्या आणि आरामदायी गाड्या प्रवाशांना उपलब्ध होतील.

२. सध्याच्या काळात ‘शिवशाही’ गाड्या या हिरकणीत रूपांतरित करण्यात येत असून अशा १२ गाड्या रूपांतरित करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर होईल.

३. चौकशीसाठी प्रत्येक आगारात, बसस्थानकावर जे ‘दूरभाष’क्रमांक देण्यात आले आहेत. त्यावर आम्ही सातत्याने लक्ष ठेवून असून एखादा क्रमांक बंद असल्यास तो तात्काळ दुरुस्त करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत.

४. सहलीच्या माध्यमातून एस्.टी.ला घसघशीत उत्पन्न मिळत असून यंदाच्या वर्षी ५ कोटी ७१ लाख ५६ सहस्र रुपयांचे उत्पन्न एस्.टी.ला प्राप्त झाले. यात २ सहस्र १४६ बसगाड्या प्रासंगिक करारापोटी देण्यात आल्या.

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या दौर्‍याच्या कालावधीत एस्.टी.च्या उपाहारगृहात तेथील मालकाने उपाहारगृहाच्या खाद्यपदार्थांच्या मूल्यावर पट्टी लावलेली आढळून आली होती. अशा प्रकारे प्रवाशांना दर न कळता पट्टी लावल्याविषयी परिवहनमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. यावर ‘संबंधित उपाहारगृह मालकाकडून खुलासा मागवला असून त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल’, असे विभाग नियंत्रकांनी सांगितले.