‘बिट्स पिलानी’ संस्थेच्या परिसरात आणखी एका विद्यार्थ्याची आत्महत्या

  • गोव्यातील ‘बिट्स पिलानी’मध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे सत्र चालूच !

  • १५ महिन्यांत ६ विद्यार्थ्यांची आत्महत्या !

पणजी – गोव्यातील नामांकित ‘बिट्स पिलानी’ या उच्च तंत्रज्ञान शैक्षणिक संस्थेच्या मागे असलेल्या भाड्याच्या खोलीत केरळमधील अर्जुन साबू या २६ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली. घटनास्थळी विद्यार्थ्याने लिहिलेली चिठ्ठी सापडली असून पोलीस मृत्यूमागील कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. ४ महिन्यांपूर्वी, म्हणजे २ फेब्रुवारी २०२६ मध्ये ‘इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनीयरिंग’ शाखेच्या तिसर्‍या वर्षात शिक्षण घेत असलेल्या वैष्णवी जिटेश या २० वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केली होती. ही घटना ताजी असतांनाच अर्जुन साबू याने आत्महत्या केल्यामुळे  विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये  भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘बिट्स पिलानी’मधील विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांची शृंखला चालून असून १५ महिन्यांत ६ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे.

बिट्स पिलानीमधील आत्महत्यांचे सत्र

४ सप्टेंबर २०२५ या दिवशी कर्नाटकातील १९ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली. १६ ऑगस्ट २०२५ या दिवशी उत्तरप्रदेशातील कुशाग्र जैन या विद्यार्थ्याचा गूढ मृत्यू झाला होता. रात्री टेबल टेनिस खेळल्यानंतर त्याने ४ बाटल्या शक्तीवर्धक प्येय प्यायल्याने मेंदूला इजा झाली आणि त्याचा मृत्यू झाला, असे सांगितले जात होते. १ मे २०२५ या दिवशी उत्तरप्रदेशातील कृष्णा कासेरा याने आत्महत्या केली. त्याचा शैक्षणिक आलेख खालावत चालल्याने तो चिंतेत होता. वर्ष २०२४ पासून विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे सत्र चालू आहे.

शैक्षणिक दबाव, हे मुख्य कारण ?

विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एक समिती स्थापन केली होती. या समितीच्या मते, एका आत्महत्येची बातमी दुसर्‍या तणावग्रस्त विद्यार्थ्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त करू शकते. सर्व घटना परीक्षेच्या काळातच घडल्याने शैक्षणिक दबाव, हे मुख्य कारण असल्याचे स्पष्ट होत आहे. बिट्स प्रशासनाने विद्यार्थ्यांसाठी २४ घंटे ‘हेल्पलाइन’ आणि समुपदेशन चालू केले आहे.