बोरामणी शिवारातील (सोलापूर जिल्हा) दावल मलिक दर्गा परिसरातील ५ एकर वनभूमीवरील अतिक्रमण हटवले !

वनभूमीवरील अतिक्रमण हटवतांना जेसीबी

सोलापूर – दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी शिवारातील गट क्र. ७६९ आणि ५७४ हे वर्ष १८८४ पासून ‘राखीव वन’ म्हणून घोषित असलेल्या भूमीवरील दावल मलिक दर्गा परिसरातील सुमारे ५ एकरांवरील अतिक्रमण वन विभागाने मोठ्या पोलीस बंदोबस्तात काढले. (एवढे अतिक्रमण होईपर्यंत झोपलेल्या अधिकार्‍यांवरही कारवाई हवी ! – संपादक)

ही कारवाई पहाटेपासून सायंकाळपर्यंत चालू होती. अतिक्रमण हटवण्यासाठी ४ जेसीबी, २ ट्रॅक्टर आणि १०० हून अधिक पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. या मोहिमेत १८ पत्र्यांच्या टपर्‍या, पाण्याच्या टाक्या, तसेच पक्की बांधकामे जेसीबीच्या साहाय्याने भुईसपाट करण्यात आली. अनुचित प्रकार टाळण्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ही कारवाई गोपनीयता आणि नियोजनबद्धतेने करण्यात आली. या कारवाईत पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पुणे वनसंरक्षक आशिष ठाकरे, सोलापूर उपवनसंरक्षक कुलराज सिंह, साहाय्यक वनसंरक्षक अजित शिंदे, ऐश्वर्या शिंदे, तसेच तालुका पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्यासह सोलापूर, माळशिरस, मोहोळ, सांगोला, पंढरपूर आणि बार्शी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी अन् कर्मचारी सहभागी झाले होते. या भूमीवर केवळ धार्मिक विधींसाठी प्रवेशाचा हक्क मान्य होता; मात्र अलीकडील काळात येथे अवैध पत्र्याच्या शेड, टपर्‍या आणि पक्की बांधकामे उभारण्यात आली होती.

यापूर्वी भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी विधीमंडळात लक्षवेधी सूचना मांडून या अतिक्रमणाचे सूत्र उपस्थित केले होते. त्यानंतर वन विभागाने नोटिसा बजावूनही अतिक्रमण हटवले नसल्याने अंतिम सूचनेनंतर ही कारवाई करण्यात आली.