शहरी आणि ग्रामीण भागांतील युवकांचे प्रश्न सोडवले जातील ! – अभिजित दीपके, कॉकरोच जनता पक्ष

अभिजित दीपक, कॉकरोच जनता पक्ष

छत्रपती संभाजीनगर – येथून पुढे शहरी आणि ग्रामीण भागांतील तरुण, शेतकरी अन् कामगार युवकांचे जे काही प्रश्न असतील, ते आमच्या चळवळीद्वारे मांडले जातील.

पक्षाची अधिकृत नोंदणी करण्याविषयी अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. ज्या लाखो लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि आमचे सदस्यत्व घेतले आहे, त्यांच्याशी संवाद साधूनच पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती ‘कॉकरोच जनता पक्षा’चे (सीजेपी) अभिजित दीपके यांनी येथे ७ जून या दिवशी आयोजित एका पत्रकार परिषदेत दिली.

‘कॉकरोच जनता पार्टी’ची विचारधारा काँग्रेसशी मिळती-जुळती असल्याच्या काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या विधानावर बोलतांना दीपके म्हणाले, ‘‘आमची प्रेरणा मोहनदास गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू आणि क्रांतीकारक भगतसिंह हेच आहेत आणि हीच आमच्या पक्षाची मूळ विचारधारा आहे.’’

ते म्हणाले की, ही एक संपूर्णपणे राजकीय चळवळ आहे. ५ वर्षांतून एकदा फक्त मत देणे म्हणजेच राजकारण नसते, तर तुम्ही ज्याला निवडून दिले आहे त्याला ५ वर्षे प्रश्न विचारत रहाणे म्हणजे ‘राजकारण’ आहे. आजचा तरुण आता अशा गोष्टींना घाबरणार नाही. आमच्या आंदोलनाला सोनम वांगचूक, विश्वंभर चौधरी, अंजली दमानिया, प्रशांत भूषण आणि सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता संजय हेगडे यांसारख्या नामांकित व्यक्तींचा पाठिंबा मिळाला आहे; मात्र विरोधी पक्षांशी आमचा कोणताही संपर्क झालेला नाही.