Air India Crash : अपघातामागे लिथियम बॅटरीतील बिघाड असल्याचा वैमानिकांच्या संघटनेचा दावा

कर्णावती येथील एअर इंडियाच्या अपघाताचे प्रकरण

नवी देहली – गुजरातमधील कर्णावती येथे १२ जून २०२५ या दिवशी लंडनला जाणार्‍या एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला होता. या प्रकरणात सरकारी अहवालात वैमानिकाला उत्तरदायी धरण्यात आले होते. त्याला वैमानिकांच्या संघटनेकडून विरोध करण्यात आला होता. आता या संघटेनेने, म्हणजे ‘फेडरेशन ऑफ इंडियन पायलट्स’ने सरकारला २१ पानांचे सविस्तर पत्र लिहिले आहे. या पत्रात ‘हा अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे नाही, तर विमानात बसवलेल्या लिथियम बॅटरीमधील बिघाडामुळे झाला’, असा दावा करण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

लिथियम बॅटरीमध्ये ‘शॉर्ट सर्किट’ होऊन इंधन पुरवठा झाला बंद !

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या संघटनेने या संदर्भात पुरावे सादर केले आहेत. त्यांच्या मते, विमानाच्या लिथियम बॅटरीमध्ये शॉर्ट सर्किट झाले होते. या शॉर्ट सर्किटमुळे विमानाच्या यंत्रणेत बिघाड झाला आणि दोन्ही इंजिनचे ‘फ्यूल स्विच’ (इंधन पुरवठा करणारे बटण) आपोआप बंद झाले. धक्कादायक गोष्ट म्हणजे वैमानिकांनी कोणतीही हालचाल न करता किंवा बटण न दाबताही हा पुरवठा खंडित झाला आणि यामुळे विमान कोसळले.

या २१ पानांच्या पत्रात या तांत्रिक बिघाडाचे पूर्ण विश्लेषण केले आहे. विमानातील तांत्रिक त्रुटी कशा प्रकारे विमानाला मृत्यूच्या सापळ्यात रूपांतरित करू शकतात ?, हे यात स्पष्ट करण्यात आले आहे. बॅटरीमधील शॉर्ट सर्किटमुळे इंजिनचे नियंत्रण सुटणे, ही विमान वाहतूक क्षेत्रातील एक अत्यंत गंभीर आणि धोकादायक गोष्ट मानली जाते.