नवापूर येथे १ लाख ४० सहस्र पक्षी नष्ट करणार !

‘बर्ड फ्ल्यू’चा प्रादुर्भाव !

नवापूर (नंदुरबार) – नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर परिसरात ‘बर्ड फ्ल्यू’ (पक्ष्यांमधील संसर्गजन्य रोग) संसर्गाचा धोका वाढल्याने प्रशासनाने सतर्कता म्हणून परिसरातील अनुमाने १ लाख ४० सहस्र पक्षी नष्ट करण्याचे ‘कलिंग ऑपरेशन’ (संक्रमण थांबवण्यासाठी पक्ष्यांना मारण्याची मोहीम) तातडीने हाती घेतले आहे. कुक्कुटपालन केंद्रामधील पक्ष्यांच्या नमुन्यांत ‘बर्ड फ्ल्यू’चा प्रादुर्भाव असल्याचे निष्पन्न झाले आहे. हा संसर्ग माणसांमध्ये पसरू नये, यासाठी आरोग्य आणि पशुसंवर्धन विभागाने कंबर कसली आहे.

ज्या भागात संसर्ग आढळला आहे, त्या परिसराच्या १ कि.मी. परिघातील सर्व कुक्कुटपालन केंद्रामधील पक्षी शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट केले जात आहेत. या मोहिमेसाठी जिल्हा प्रशासनाने विशेष पथके तैनात केली आहेत.