गड, दुर्ग आणि पुरातन वास्तू यांच्या विकासासाठी ‘स्थळ व्यवस्थापन नियोजन आराखडा’ सिद्ध करा !

सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश

सांस्कृतिक कार्यमंत्री अधिवक्ता आशिष शेलार

मुंबई – राज्यातील ऐतिहासिक गड, दुर्ग आणि पुरातन वास्तू यांचा ठेवा जतन करणे, त्यांचा पर्यटनदृष्ट्या सर्वांगीण विकास करणे आणि दीर्घकालीन अस्तित्व टिकवण्यासाठी ‘स्थळ व्यवस्थापन नियोजन आराखडा’ सिद्ध करा, असे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री अधिवक्ता आशिष शेलार यांनी दिले. पु.ल. देशपांडे कला अकादमीच्या सभागृहात झालेल्या बैठकीत कंधार भुईकोट गड (नांदेड), कोरठण खंडोबा देवस्थान (अहिल्यानगर) आणि चारठाणा येथील पुरातन मंदिर (परभणी) यांचे जतन, संवर्धन आणि विकास यांविषयी चर्चा झाली.

१. नांदेड येथील कंधार भुईकोट गड येथे २४ एकर परिसर पर्यटकांसाठी सुरक्षित आणि सोयीस्कर करावा. तेथे सुरक्षारक्षक नेमावेत. खंदकातील गाळ तातडीने काढावा.

२. अहिल्यानगर येथील कोरठण खंडोबा देवस्थानाची वास्तू ‘संरक्षित स्मारक’ आहे का ?, हे पडताळून अहवाल द्यावा. तसे नसल्यास संरक्षित स्मारक म्हणून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी आणि सुरक्षा नियमावली लागू करावी.

३. परभणी येथील चारठाणा मंदिराचा एकत्रित विकास आराखडा राबवावा. मंदिर परिसरातील अतिक्रमणे हटवावीत. भूसंपादनाची आवश्यकता असल्यास त्वरित प्रक्रिया करावी. जिल्हा नियोजन समिती आणि सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या निधीतून कालबद्ध कार्यक्रम राबवावा.

‘राज्याचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी शासन कटीबद्ध असून या कामांमध्ये विलंब खपवून घेतला जाणार नाही. सांस्कृतिक वारसा ही राज्याची ओळख असून त्याचे जतन हे सामूहिक दायित्व आहे’, असे मंत्री अधिवक्ता आशिष शेलार म्हणाले. त्यांनी सर्व कामांवर सातत्याने देखरेख ठेवण्याचे निर्देशही प्रशासनाला दिले आहेत.