हिंदु राष्ट्र निश्चितच बनेल ! – Mahabharat Actors

‘महाभारत’ मालिकेतील कलाकारांची पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या सभेत गर्जना

(डावीकडून) अभिनेते पुनीत इस्सर, अभिनेते गजेंद्र चौहान व पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – येथे आयोजित बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या प्रवचन सभेच्या वेळी बी.आर्. चोपडा यांच्या ‘महाभारत’ सुप्रसिद्ध मालिकेतील कलाकार उपस्थित होते. त्यांनी व्यासपिठावरून हिंदु धर्माचे रक्षण आणि देशाला ‘हिंदु राष्ट्र’ बनवण्यावर भर दिला. त्यांच्या या आक्रमक विधानांनी सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

धर्मांतरापासून सावध रहा ! – पुनीत इस्सर (दुर्याेधन)

‘महाभारत’ मालिकेत ‘दुर्योधना’ची भूमिका साकारणारे अभिनेते पुनीत इस्सर म्हणाले की, ‘अशा सभा पाहून वाटते की, आपला हिंदु समाज आता जागृत झाला आहे आणि हिंदु राष्ट्र निश्चितच बनेल. मी माझ्या माता-भगिनी आणि भाऊ यांना हे निश्चित सांगू इच्छितो की, त्यांनी स्वतःच्या मुलांना धर्माविषयी माहिती द्यावी. आजूबाजूच्या लोकांपासून सतर्क रहा. ज्या प्रकारे सक्तीने धर्मांतर केले जात आहे, लेकी-सुना यांना भुलवले जात आहे आणि त्यांचे धर्मांतर केले जात आहे, त्यांपासून सावध रहा. कोणत्याही परिस्थितीत हे होता कामा नये.’ तसेच पुनीत इस्सर यांनी शास्त्रासमवेतच ‘शस्त्र’ विद्येचीही आवश्यकता असल्याचे सांगत सर्वांना व्यायामावर भर देण्याचे आवाहन केले.

धर्माच्या विरोधात काम करणार्‍यांचा विनाश अटळ ! – गजेंद्र चौहान (युधिष्ठिर)

महाभारत मालिकेतील ‘युधिष्ठिर’, म्हणजेच गजेंद्र चौहान सभेला संबोधित करतांना म्हणाले की, ‘महाभारत’ मालिका सर्वांनी पाहिली; पण आम्ही ती (अभिनयातून) जगली आहे. आम्ही त्या पापी लोकांचा सत्यानाश केला, जे धर्माच्या विरोधात होते. धर्माच्या विरोधात काम करणार्‍यांचा विनाश होणे अटळ आहे. आपल्यासाठी राष्ट्रापेक्षा मोठे काहीही नाही.

धर्मावर संकट आल्यावर तटस्थ न रहाता त्याच्या रक्षणासाठी उभे रहा !- नितीश भारद्वाज (श्रीकृष्ण)

अभिनेते नितीश भारद्वाज

मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका साकारणारे नितीश भारद्वाज यांनी भगवद्गीतेतील श्लोकांचा आधार घेत धर्मरक्षणाविषयी भाष्य केले. त्यांनी समाजाला प्रेम आणि एकता यांचा संदेश दिला; पण त्यासमवेतच धर्मावर संकट आल्यावर तटस्थ न रहाता त्याच्या रक्षणासाठी उभे रहाण्याचे आवाहन केले.