अधिकाधिक हानीभरपाई मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार ! – पालकमंत्री नितेश राणे

सावंतवाडी शहरात वादळामुळे झालेल्या हानीची पालकमंत्र्यांनी केली पहाणी

पंचम खेमराज महाविद्यालयाच्या इमारतीची पहाणी करतांना डावीकडून मंत्री नितेश राणे, (तिसरे) आमदार दीपक केसरकर, (चौथ्या) नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोसले, (सहावे) श्री. युवराज लखमराजे भोसले आणि अन्य

सावंतवाडी – दोन दिवसांपूर्वी वादळी वार्‍यासह पडलेल्या पावसामध्ये सावंतवाडी शहरात मोठ्या प्रमाणात हानी झाली. पंचनाम्यानुसार २५ लाख रुपयांची हानी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ग्रामीण भागात ६१ घरांची हानी झाली. याविषयी जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करून शासकीय निकषांनुसार अधिकाधिक हानीभरपाई मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.

वादळामुळे झालेल्या हानीची पहाणी करण्यासाठी पालकमंत्री राणे यांनी सावंतवाडी येथील पंचम खेमराज महाविद्यालयाला २५ एप्रिलला भेट दिली. या वेळी आमदार दीपक केसरकर, नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे भोसले, तहसीलदार श्रीधर पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, तसेच स्थानिक नगरसेवक उपस्थित होते. महाविद्यालयाच्या परिसरात झालेल्या हानीची प्रत्यक्ष पहाणी करून त्यांनी संबंधित अधिकार्‍यांना आवश्यक सूचना दिल्या.

या वेळी बोलतांना राणे म्हणाले की, मान्सूनपूर्व सिद्धतेविषयी जिल्हा पातळीवर आढावा बैठक घेण्यात येणार आहे. मान्सूनपूर्व सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत. संभाव्य आपत्ती लक्षात घेऊन प्रशासनाने सज्ज रहावे, यासाठी विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधला जात आहे. या माध्यमातून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जात आहे.