सप्तशृंगी गडावरील मंदिराच्या नक्षीकामातील साडेबावीस किलो चांदी गहाळ !

ट्रस्टचे तत्कालीन अध्यक्ष, विश्वस्त आणि उत्तरदायी अधिकारी यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे नोंद !

सप्तशृंगी देवी

नाशिक – लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील सप्तशृंगी गडावरील मंदिराच्या नक्षीकामातील साडेबावीस किलो चांदी गहाळ झाली आहे. येथील व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे सुट्टीवर असतांना रात्री विश्वस्तांनी गर्भगृहातील चांदी काढल्याचे विभागीय आयुक्त कार्यालयातील चौकशीत निदर्शनास आले आहे. या प्रकरणी ट्रस्टचे तत्कालीन अध्यक्ष, विश्वस्त आणि उत्तरदायी अधिकारी यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत. ‘अपहार झालेल्या चांदीची रक्कम व्याजासह वसूल करावी’, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विठोबा द्यानद्यान यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. त्यांनी विभागीय आयुक्तांकडेही तक्रार केली आहे.

१. गर्भगृहातील नक्षीकामासाठी पूर्वीच्या नोंदीनुसार अनुमाने ४०६ किलो चांदी वापरली होती; पण प्रत्यक्ष मोजणीत ती ३८३ किलो ७०३ ग्रॅम इतकीच आढळली.

२. अपर आयुक्त (महसूल) जितेंद्र वाघ यांनी चौकशीचा आदेश दिला आहे, तसेच  जिल्हाधिकारी कार्यालयानेही साहाय्यक जिल्हाधिकारी (कळवण), तहसीलदार कळवण तसेच ट्रस्टचे कार्यकारी अधिकारी यांना सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ‘या प्रकरणी फौजदारी गुन्हा नोंदवावा’, अशी मागणी द्यानद्यान यांनी केली होती.

३. श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर देवस्थान येथे दर्शनासाठी विश्वस्तांकडून केले गेलेले काळाबाजाराचे प्रकरण उघड झाले. त्यामुळे त्र्यंबकेश्वरप्रमाणेच येथेही चौकशी केल्यास तत्कालीन विश्वस्तांचा मोठा गैरकारभार उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. माजी विश्वस्तांकडून अनेक चुकीचे प्रकार घडले असून चौकशीत ते उघड होण्याची शक्यता आहे.

४. सप्तशृंगी ट्रस्टने १५ सप्टेंबर २०२१ या दिवशी ठराव करून चांदी दिवसा काढण्याचे नियोजन केले होते; परंतु दुसर्‍याच दिवशी रात्री मूल्यमापकाच्या अनुपस्थितीत गर्भगृहातील चांदी उतरवण्यात आली. यासंदर्भात ट्रस्टचे व्यवस्थापक दहातोंडे यांनी अध्यक्ष आणि धर्मादाय आयुक्तांना दिलेले पत्र पुरावा ठरले. याचा मनात राग धरून विश्वस्तांनी दहातोंडे यांच्या विरोधात कटकारस्थान करून त्यांच्यावरच निलंबनाची कारवाई केली.

सत्य बाहेर आणण्याची मागणी !

मंदिरातील चांदी ही भाविकांच्या श्रद्धेची ठेव आहे. तिच्या संरक्षणाचे दायित्व असलेल्यांकडूनच अपप्रकार होत असेल, तर ते समाजासाठी धोक्याचे आहे. या प्रकरणी सत्य बाहेर यावे. – विठोबा द्यानद्यान, सामाजिक कार्यकर्ते

संपादकीय भूमिका

  • मंदिर सरकारीकरणाचा दुष्परिणाम ! चांदी गहाळ करणार्‍यांना आजन्म कारागृहात डांबण्याचीच शिक्षा योग्य ठरेल !
  • हिंदू अशा घटनांविषयी अनभिज्ञ असतात, त्यांना या प्रकारांविषयी दुःखही वाटत नाही. त्यामुळेच अशा घटना वाढत जाऊन धर्महानी ओढावते. हिंदूंनी मंदिरे सुरक्षित रहाण्यासाठी पुढकार घ्यायला हवा !