दारूच्या बाटल्या आणि विविध प्रकारचा कचरा केला गोळा

गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानची रत्नदुर्ग महादरवाजा संवर्धन मोहीम

रत्नागिरी – ऐतिहासिक रत्नदुर्गावर महादरवाजा परिसरात गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, रत्नागिरी विभाग यांच्या वतीने नुकतीच व्यापक संवर्धन मोहीम राबवण्यात आली. प्रतिष्ठानचे मावळे आणि रणरागिणी यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या मोहिमेत दुर्गावरील स्वच्छता अन् जतन यांचे काम करण्यात आले. या मोहिमेदरम्यान पुन्हा एकदा दुर्गाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर दारूच्या रिकाम्या बाटल्या आणि विविध प्रकारचा कचरा आढळून आला. स्वयंसेवकांनी कचरा गोळा करत स्वच्छता केली असली, तरीही ही गोष्ट अत्यंत निंदनीय असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

मागील ३ वर्षांपासून गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान सातत्याने रत्नदुर्गावर संवर्धन कार्य करत असूनही काही नागरिकांकडून दुर्गाचे पावित्र्य आणि ऐतिहासिक महत्त्व जपले जात नसल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. वारंवार स्वच्छता मोहीम राबवूनही रत्नदुर्गावर मद्यपान करून कचरा टाकण्याचे प्रकार चालूच असल्याने संताप व्यक्त होत आहे.

‘दुर्ग हे केवळ पर्यटनस्थळ नसून आपल्या इतिहासाचे जिवंत प्रतीक आहे. त्याचे जतन करणे, हे प्रत्येकाचे दायित्व आहे’, असे मत प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. संबंधित प्रशासनानेही या प्रकारांकडे गांभीर्याने लक्ष देऊन कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.

‘अशा प्रकारच्या मोहिमा पुढेही चालू रहाणार असून नागरिकांनीही दायित्वाची जाणीव ठेवून गड-दुर्गांचे पावित्र्य राखावे’, असे आवाहन करण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

  • स्वतःचे आयुष्य पणाला लावून छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे यांनी गड स्वराज्यात आणले. अशा गड-दुर्गांची दुःस्थिती मद्यपी आणि पर्यटक यांच्याकडून केली जाणे, हे दुर्दैवच !
  • गड-दुर्ग सहलीची नव्हे, तर वीरतेच्या जागृतीची केंद्रे बनावीत, यासाठी सर्वांसह प्रशासनानेही कार्यरत रहाणे आवश्यक !