‘मुंबई-बेंगळुरू वन्दे भारत एक्सप्रेस’ला सांगलीत थांबा द्या !

अन्यथा ‘रेल रोको’ आंदोलनाची चेतावणी !

सांगली, १२ एप्रिल (वार्ता.) – जागतिक हळद बाजारपेठ आणि औद्योगिक केंद्र म्हणून नावलौकिक असलेल्या सांगली जिल्ह्यावर रेल्वे प्रशासनाकडून अन्याय होत आहे. ५ एप्रिल या दिवशी घोषित झालेल्या ‘मुंबई-बेंगळुरू वन्दे भारत स्लीपर एक्सप्रेस’ला सांगली रेल्वेस्थानकावर थांबा नाकारण्यात आला. या अन्यायाविरुद्ध ‘सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचा’ने थांबा न मिळाल्यास अनिश्चित काळासाठी ‘रेल रोको’ (रेल्वे थांबवा) आंदोलन करून उपोषणाला बसण्याची चेतावणी ‘सांगली जिल्हा नागरिक जागृती मंच’चे अध्यक्ष श्री. सतीश साखळकर यांनी प्रशासनाला दिली आहे. (मराठीबहुल महाराष्ट्रात आंदोलनाचे नाव हिंदीत देण्याची वेळ का येते ? – संपादक) त्यांनी दक्षिण पश्चिम रेल्वे (हुबळी) आणि मध्य रेल्वे (मुंबई) यांच्या महाव्यवस्थापकांना निवेदन पाठवले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, सांगली हे ‘एरोस्पेस हब’ (असे केंद्र जिथे विमान वाहतूक, संरक्षण आणि अंतराळ तंत्रज्ञानाशी संबंधित संशोधन, उत्पादन आणि देखभाल केली जाते) असून ‘इस्रो’च्या चांद्रयान आणि मंगलयान मोहिमांमध्ये येथील उद्योगांचे मोलाचे योगदान आहे. असे असतांनाही रेल्वे प्रशासन सांगलीच्या विकासाला खीळ घालत आहे. सांगली स्थानकावरून प्रतिवर्षी ५० सहस्रांहून अधिक प्रवासी ‘वन्दे भारत’ रेल्वेचा लाभ घेतात. सर्वाधिक उत्पन्न देऊनही सांगलीला डावलले जात असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. जर प्रशासनाने तात्काळ थांबा मान्य केला नाही, तर सांगली स्थानकावर उग्र आंदोलन छेडण्यात येईल. या वेळी रेल्वेच्या मालमत्तेची हानी झाल्यास त्याला सर्वस्व रेल्वे प्रशासनच उत्तरदायी असेल.