सातारा मध्यवर्ती बसस्थानकामध्ये घाणीचे साम्राज्य

सातारा मध्यवर्ती बसस्थानकामध्ये पसरलेले घाणीचे साम्राज्य

सातारा, ९ एप्रिल (वार्ता.) – पुणे-बेंगळुरू महामार्गावरील मध्यवर्ती बसस्थानक म्हणून ओळख असणार्‍या सातारा बसस्थानकामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून प्रवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. एस्.टी. (राज्य परिवहन) प्रशासनाच्या गलथान कारभारावर प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. (राज्य परिवहन महामंडळाच्या प्रशासनाला या समस्या लक्षात येत नाहीत का ? या महामंडळाशी संबंधित मंत्री महामंडळाचे उत्पन्न वाढवणे, बसस्थानकात चांगल्या नागरी सुविधा पुरवणे यांसाठी प्रयत्नशील असतांना सातारा बसस्थानक प्रशासन झोपा काढत आहे का ? – संपादक)

सातारा बसस्थानकातून पुणे, मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, बेळगाव, कोकण, गोवा, विजापूर, नांदेड, शिर्डी यांसह अन्य ठिकाणी प्रतिदिन शेकडो बस ये-जा करत असतात. त्यामुळे बसस्थानकात नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. सध्या जुन्या मुंबई, पुणे फलाट परिसरात बसस्थानकातील कचरा टाकला जातो. त्यामुळे या परिसरात कचर्‍याचे ढीग साठले आहेत. कचर्‍यामुळे बसस्थानकाला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे.

संपादकीय भूमिका

एस्.टी. महामंडळाने प्रतिदिन या ठिकाणचा कचरा उचलला पाहिजे, तरच परिसर स्वच्छ राहील. कचर्‍यामुळे दुर्गंधी पसरली असल्याने एस्.टी. कर्मचारी आणि प्रवासी यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. माशा आणि डासांचा वावरही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यासाठी एस्.टी. प्रशासनाने विशेष उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.