मंदिर सरकारीकरण आणि वक्फ बोर्डाच्या अतिक्रमणाविरोधात लढा तीव्र करण्याचा निर्धार !

अकोला येथे देवस्थान भूमी संरक्षण परिषद !

व्यासपिठावर उपस्थित डावीकडून श्री. श्रीकांत पिसोळकर, श्री. प्रमोद अग्निहोत्री, श्री. सुनील घनवट, श्री. दिनकर ठाकरे, श्री. प्रशांत देशमुख, श्री. अरविंद देठे

अकोला – सरकारने ‘देवस्थान इनाम निर्मूलन कायद्या’चे प्रारूप स्थगित करणे हा हिंदूंच्या संघटित शक्तीचा मोठा विजय असून पुढील लढा मंदिरांच्या भूमी वक्फ बोर्डाच्या कह्यातून मुक्त करण्याचा असेल आणि मंदिर भूमी बळकावणार्‍यांच्या विरोधात ‘अँटी-लँड ग्रॅबिंग’ (भूमी अधिग्रहण) कायदा करण्यासाठी प्रयत्न करणार, असा निर्धार येथे आयोजित केलेल्या ‘देवस्थान भूमी संरक्षण परिषदे’त व्यक्त करण्यात आला. या परिषदेला हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक, तसेच राष्ट्रीय मंदिर महासंघाचे संघटक श्री. सुनील घनवट यांच्यासह अकोला अन् विदर्भातील विविध मंदिरांचे १५० विश्वस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी श्री. सुनील घनवट यांनी सांगितले, ‘‘मंदिर विश्वस्तांनी संघटित झाल्यास देशातील ४ लाख मंदिरे सरकारीकरणातून मुक्त होतील.’’ हिंदु जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर यांनी परिषदेची प्रास्ताविक भूमिका मांडली. त्यांनी महाराष्ट्र मंदिर महासंघाने आतापर्यंत केलेले कार्य आणि मिळालेले ऐतिहासिक यश यांचा आढावा घेतला.

या प्रसंगी व्यासपिठावर श्री चंडिकादेवी संस्थानचे अध्यक्ष श्री. प्रशांत देशमुख, स्वयंभू महादेव अंत्रीचे अध्यक्ष श्री. अरविंद देठे, हनुमान मंदिराचे विश्वस्त श्री. प्रमोद अग्निहोत्री, मूर्तीजापूर मंदिर महासंघाचे विश्वस्त दिनकर ठाकरे आदी उपस्थित होते.