India’s Nuclear Submarine :  बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी सज्ज भारताची तिसरी आण्विक पाणबुडी नौदलात दाखल !

  • ‘आय.एन्.एस्. तारागिरी’ युद्धनौकेचेही जलावतरण

  • केवळ बोलत नाही, करून दाखवतो ! - संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

‘केवळ बोलत नाही, करून दाखवतो’,- राजनाथ सिंह

विशाखापट्टणम् (आंध्रप्रदेश) – बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी सज्ज ‘आय.एन्.एस्. अरिदमन’ ही तिसरी आण्विक पाणबुडी भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आली. येथे झालेल्या कार्यक्रमात अत्याधुनिक बनावटीच्या ‘आय.एन्.एस्. तारागिरी’ या युद्धनौकेचेही जलावतरण पार पडले. या वेळी देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘केवळ बोलत नाही, करून दाखवतो’, अशा आशयाचे लिखाण राजनाथ सिंह यांनी या कार्याक्रमापूर्वी प्रसारित केले होते.

१. ‘आय.एन्.एस्. अरिदमन’च्या समावेशामुळे भारताच्या नौदलात आता बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी सज्ज असणार्‍या ३ आण्विक पाणबुड्या झाल्या आहेत. यापूर्वी ‘आय.एन्.एस्. अरिहंत’ आणि ‘आय.एन्.एस्. अरिघात’ या लांब पल्ल्याच्या अण्वस्त्रवाहू पाणबुड्यांचा नौदलात समावेश आहे. यानंतर चौथीही अशा प्रकारची पाणबुडी लवकरत नौदलात दाखल होणार आहे.

२. ‘आय.एन्.एस्. तारागिरी’ हिची हवा, समुद्र आणि पाणबुडी अशा तिन्ही स्तरांवर शत्रूला प्रत्युत्तर देण्याची तिची क्षमता अत्यंत भक्कम आहे. अत्याधुनिक स्टेल्थ तंत्रज्ञानामुळे शत्रूच्या ‘रडार’ला चकवा देत अचूक कारवाई करणे या युद्धनौकेस शक्य होणार आहे. या नौकेमुळे भारताचे सागरी सामर्थ्य वाढले आहे.

३. राष्ट्राच्या सुरक्षेसाठी स्वदेशी शस्त्रनिर्मिती आणि बलाढ्य नौदल याचे ‘आय.एन.एस्. तारागिरी’ प्रतीक ठरली आहे. वर्ष २०२६ पर्यंत या प्रकल्पातील उर्वरित युद्धनौकाही नौदलात भरती होणार असल्याने भारताचा हिंद महासागरातील दबदबा आणखी वाढणार आहे.

४. मुंबई येथील माझगाव डॉक शिप बिल्डर्सने ‘तारागिरी’ची निर्मिती केली असून तिची लांबी १४९ मीटर, रूंदी १७.८ मीटर आहे. तिचे एकूण वजन ६.६७० टन आहे. तिचा वेग ३२ नॉट (समुद्र मैल) ५२ ते ५९ किमी/घंटा इतका आहे.

५. तिच्यामध्ये ब्रह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्रे, एम्.एफ्.- स्टार रडार, मध्यम पल्ल्याची हवाई संरक्षण प्रणाली, ७६ मिमी तोफ, टॉर्पेडो आणि पाणबुडीविरोधी रॉकेट्स यांसारखी आधुनिक शस्त्रसज्जता आहे.