जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेसाठी लाखो भाविकांची गर्दी

गुलाल आणि खोबरे यांची उधळण !

श्री जोतिबा

कोल्हापूर – ‘जोतिबाच्या नावाने चांगभलं’च्या गजरात लाखो भाविकांनी चैत्र यात्रेसाठी जोतिबा डोंगरावर गर्दी केली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश येथून आलेल्या भाविकांनी केलेल्या गुलाल आणि खोबरे यांच्या उधळणीने संपूर्ण डोंगर न्हाऊन निघाला आहे. गेल्या २ दिवसांपासून भाविक विविध ठिकाणांहून डोंगरावर येत असून १० लाखांहून अधिक भाविकांनी जोतिबा देवाचे दर्शन घेतले.

भाविकांची अलोट गर्दी

विविध गावांमधून येणार्‍या ३० ते ४० फूट उंचीच्या सासनकाठ्या, हे या यात्रेचे एक मुख्य आकर्षण असते. सकाळी ५ ते ६ या वेळेत देवाची शासकीय महापूजा झाल्यावर दुपारी १२ वाजता देव केदारनाथांची धूपारती आणि पंचारती केली गेली.

आरतीनंतर मानाच्या सासनकाठ्यांचे पूजन झाल्यानंतर भव्य मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी जोतिबा देवाच्या पालखीने यमाई मंदिराकडे प्रस्थान केले. रात्री देवाचे महास्नान, स्तोत्रगान, मानकर्‍यांना पानविडा आणि तोफेच्या सलामीने यात्रेची सांगता झाली.

‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’च्या वतीने १२० हून अधिक ‘सीसीटीव्ही’, वैद्यकीय शिबिरे, पाणी-स्वच्छता यांसह अन्य व्यवस्था करण्यात आली होती. कोल्हापूर शहरात पंचगंगा नदी घाटावर विविध स्वयंसेवी संस्था, संघटना यांच्या वतीने भाविकांसाठी विनामूल्य प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती, तसेच काही संस्थांनी जोतिबा येथे जाण्यासाठी विनामूल्य बसची सोय केली होती. ‘एस्.टी.’च्या वतीनेही यात्रेसाठी पंचगंगा नदीघाटावर विशेष स्थानक चालू करण्यात आले आहे.


दुपारी मेघगर्जनेसह पावसाची उपस्थिती !

‘चैत्र यात्रा झाल्यावर डोंगर धुण्यासाठी पाऊस हा येतोच’, अशी आख्यायिका असून त्याप्रमाणे दुपारी ३ पासून पावसाने मेघगर्जनेसह जोरदार उपस्थिती दर्शवली. उन्हामुळे त्रस्त झालेल्या भाविकांना यामुळे काहीसा दिलासा मिळाला. अनेक ठिकाणी गारा पडल्याने वातावरणात थंडावा निर्माण झाला होता.