Nalanda Stampede : नालंदा (बिहार) येथील श्री शीतलामाता मंदिरात चेंगराचेंगरी : ९ जणांचा मृत्यू, तर अनेकजण घायाळ

गर्दीला नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस व्यवस्था नव्हती ! – भाविकांचा दावा

नालंदा (बिहार) – येथील श्री शीतलामाता मंदिरात ३१ मार्चला सकाळी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये ९ भाविकांचा मृत्यू झाला. यात ८ महिला, तर १ पुरुष यांचा समावेश आहे. मोठ्या संख्येने लोक घायाळही झाले आहेत. शीतला अष्टमीच्या निमित्ताने मोठ्या संख्येने भाविक या मंदिरात पोचले होते. तिथे जत्राही भरली होती. येथे उपस्थित लोकांनी सांगितले की, गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त नव्हता. दर्शनाच्या घाईत धक्काबुक्की झाली. चेंगराचेंगरीत अनेक लोक गर्दीत दबले गेले. घटनेनंतर मंदिर आणि जत्रा बंद करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना चौकशीचे निर्देश दिले आहेत. सरकारने मृतांच्या वारसांना ६ लाख रुपये, तर केंद्र सरकारने २ लाख रुपयांच्या हानीभरपाईची घोषणा केली आहे.

१. महिला भाविकांनी सांगितले की, चैत्र महिन्याचा हा शेवटचा मंगळवार आहे. येथे जत्रा भरली होती. गर्दी पुष्कळ वाढली. मंदिराचे गर्भगृहही लहान आहे. लोक लवकर दर्शन घेण्यासाठी एकमेकांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. कुणीही रांगेत उभे राहून पूजा करू इच्छित नव्हते.

२. एका भाविकाने सांगितले की, सुरक्षेची कोणतीही व्यवस्था नव्हती. मंदिराच्या आत प्रचंड गर्दी होती. पोलीस शिपाई आत तैनात नव्हता. गर्दीला वळवण्यासाठी किंवा दोन रांगांमध्ये विभागण्यासाठी कोणतीही व्यवस्था नव्हती. मंदिराचे पुजारीच लवकर-लवकर दर्शन घेऊन बाहेर पडायला सांगत होते. याच वेळी एका महिलेला चक्कर आली आणि ती तिथेच पडली. काही लोक तिला सावरू लागले आणि गर्दीला मागे हटवण्याचा प्रयत्न केला. याच वेळी चेंगराचेंगरी झाली.

संपादकीय भूमिका

भारतात गेली अनेक वर्षे मंदिरांच्या ठिकाणी अशा प्रकारच्या चेंगराचेंगरीच्या घटना घडत असतांना त्यावर कायमस्वरूपी नियंत्रण आणण्यासाठी सरकार, पोलीस, प्रशासन आणि मंदिर व्यवस्थापन काही करतांना दिसत नाहीत, ही वस्तूस्थिती आहे !