‘कचरा डेपो’ प्रश्नी सोनगाव ग्रामस्थांचे सातारा नगर परिषद प्रशासनाला निवेदन !

सातारा, २५ मार्च (वार्ता.) – सोनगाव येथील ‘कचरा डेपो’मध्ये  (कचरा साठवण्याच्या जागेमध्ये) लागलेल्या आगीमुळे परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. गत १५ दिवसांपासून डेपोमध्ये लागलेल्या आगीमुळे निर्माण होणारा धूर आणि दुर्गंधी यांमुळे जकातवाडी, डबेवाडी, शहापूर, साठेवाडी या परिसरांतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याविषयी स्थानिक ग्रामस्थांकडून विविध मागण्यांचे निवेदन सातारा नगर परिषद प्रशासनाला देण्यात आले. (नागरिकांना निवेदन का द्यावे लागते ? – संपादक)

निवेदनामध्ये म्हटले आहे की, ८ दिवसांत कचरा डेपोतील आग पूर्णपणे आटोक्यात आणावी; अन्यथा डेपोमध्ये कोणतीही घंटागाडी प्रवेश करू देणार नाही. शहरातील घरपातळीवर ओला आणि सुका कचरा वेगळा करूनच संकलित करण्याची सक्ती करण्यात यावी. कचरा प्रकल्पावर येणार्‍या कचर्‍याचे त्याच दिवशी वर्गीकरण करण्यात यावे. बोगदा ते सोनगाव आणि बोगदा ते डबेवाडी रस्त्यालगत साचलेला कचरा उचलण्यासाठी स्वतंत्र घंटागाडी आणि कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात यावी. धुरामुळे जकातवाडी परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. यामुळे प्रतिदिन ग्रामपंचायत कार्यालयात डॉक्टर आणि औषधे यांची व्यवस्था करण्यात यावी. अजिंक्यतारा आणि येवतेश्वर परिसरातून येणार्‍या पावसाच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी रस्त्यालगत मोठ्या गटारांची व्यवस्था करण्यात यावी. या मागण्यांवर तात्काळ कार्यवाही झाली नाही, तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, अशी चेतावणी स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने सातारा नगर परिषद प्रशासनाला देण्यात आली आहे. (अशी चेतावणी नागरिकांना का करावी लागते ? प्रशासनाला हे स्वत:हून का लक्षात येत नाही ? – संपादक)