युद्धामुळे भारतासमोरही आव्हान ! – PM Narendra Modi

  • युद्धामुळे निर्माण झालेल्या संकटावर पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत दिली सरकारच्या प्रयत्नांची माहिती

  • आखाती देशांतील भारतियांच्या सुरक्षेला प्राधान्य देत असल्याची दिली माहिती !

पंतप्रधान मोदी

नवी देहली – पश्चिम देशांतील परिस्थिती चिंताजनक आहे. या युद्धाला ३ आठवड्यांपेक्षा अधिक वेळ झाला आहे. यामुळे लोकांच्या आयुष्यावर विपरीत परिणाम होत आहे. यामुळे पूर्ण जग युद्धसमाप्तीसाठी आग्रही आहे. भारतासमोरही या युद्धामुळे आव्हान निर्माण झाले आहे. यामुळे या संकटाविरुद्ध सर्वांनी एकजूट व्हावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत युद्धाच्या संदर्भात बोलतांना केले.

पंतप्रधान मोदी यांनी मांडलेली सूत्रे – 

१. जेव्हापासून हे युद्ध चालू झाले आहे, तेव्हापासून प्रभावित देशातील प्रत्येक भारतियाला आवश्यक साहाय्य केले जात आहे. मध्य-पूर्वेतील अनेक राष्ट्राध्यक्षांशी चर्चा केली आहे. सर्वांनी भारतियांच्या सुरक्षिततेचे आश्वासन दिले आहे. या काळात काही लोकांचा मृत्यू झाला असून काही घायाळ झाले आहेत. अशा कठीण परिस्थितीत कुटुंबियांना आवश्यक साहाय्य केले जात आहे.

२. युद्ध चालू झाल्यापासून आतापर्यंत ३ लाख ७५ सहस्रांहून अधिक भारतीय सुरक्षितपणे भारतात परतले आहेत. इराणहून आतापर्यंत १ सहस्र भारतीय सुरक्षित भारतात परतले आहेत. यांमध्ये ७०० हून अधिक वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी आहे. याचा अर्थ सरकार संवेदनशीलही आहे, सतर्कही आहे आणि सरकार प्रत्येक साहाय्यासाठी तत्पर आहे.

३. युद्धामुळे पेट्रोल, डिझेल आणि गॅस यांचा पुरवठा खंडित होऊ नये, तसेच देशातील सामान्य नागरिकांना त्रास होऊ नये, सासाठी सरकार साहाय्य करत आहे. देश आपल्या आवश्यकतेच्या ६० टक्के एल्पीजी (लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस – द्रवरूप पेट्रोलियम वायू) आयात करतो. अनिश्चिततेच्या कारणामुळे सरकारने एल्पीजीच्या घरगुती वापराला प्राथमिकता दिली आहे. एल्पीजीचे देशातील उत्पादन वाढवले जात आहे. पेट्रोल आणि डिझेल यांचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी काम चालू आहे.

पेट्रोल, डिझेल आणि गॅस यांना पर्याय म्हणून इथेनॉलचा वापर !

पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, देशात गेल्या १० ते १२ वर्षांत इथेनॉलच्या उत्पादनासाठी अभूतपूर्व काम झाले आहे. त्यामुळे प्रतीवर्ष साडेचार कोटी बॅरल तेल कमी आयात करावे लागते. यामुळे रेल्वेच्या विजेकरता लाभ होत आहे, अन्यथा प्रतीवर्षी जवळपास १८० कोटी लीटर अतिरिक्त डिझेल लागले असते. आम्ही इलेक्ट्रिक वाहतुकीवर भर दिला आहे. आज ज्या प्रमाणात वैकल्पिक इंधनावर काम होत आहे, त्याद्वारे भारताचे भविष्य अधिक सुरक्षित होईल.