नक्षलग्रस्त भागांत सागवान तस्करांचा धुमाकूळ : वनमंत्र्यांकडून सखोल चौकशीचा आदेश !

विधानसभा प्रश्नोत्तरे…

काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार

मुंबई – नक्षलग्रस्त भागांतील मौल्यवान सागवान लाकडाची तस्करी करणार्‍या संघटित टोळ्यांना राजकीय पाठबळ मिळत आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे विधीमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी १८ मार्च या दिवशी विधानसभेत प्रश्नोत्तरात केला. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी मतदारसंघात तस्करांना पकडणार्‍या वन विभागाच्या प्रामाणिक अधिकार्‍यांना एका स्थानिक नेत्याकडून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली जाते आणि तस्करांना सोडवण्यासाठी दबाव टाकला जातो, असे धक्कादायक वास्तव त्यांनी मांडले.

याला उत्तर देतांना वनमंत्री गणेश नाईक म्हणाले की, ज्या अधिकार्‍यांनी राजकीय दबावाखाली येऊन तस्करांना सोडून दिले, त्यांची सखोल चौकशी करून त्यांना कठोर शासन केले जाईल. या घटनेतील परिसरातील ‘सीसीटीव्ही’ चित्रण आणि संशयितांचे ‘सीडीआर’ पडताळून (भ्रमणभाषवरून केलेल्या कॉल्सची माहिती) या संपूर्ण जाळ्याचा शोध घेतला जाईल. जर या तस्करीमागे एखादी टोळी किंवा गुंडांच्या फौजा असतील, तर त्यांचा कायमचा बंदोबस्त करून हे जाळे पूर्णपणे उद्ध्वस्त केले जाईल.