‘आयआयटी पवई’ वसतीगृहात जिवंत काडतुसे : गुन्हेगारांना अटक !

  • गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

  • बिहारमधील गुन्हेगारांच्या साखळीचा उलगडा !

‘आयआयटी पवई’ वसतीगृह

मुंबई, १३ मार्च (वार्ता.) – येथील नामांकित ‘भारतीय तंत्रज्ञान संस्था’ (आयआयटी) पवईच्या वसतीगृहात जिवंत काडतुसे सापडल्याच्या गंभीर प्रकरणी पोलिसांनी सखोल अन्वेषण करून संबंधितांना अटक केली आहे. या प्रकरणाच्या मुळापर्यंत पोचून संपूर्ण साखळीचा शोध घेण्यात आला आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत १२ मार्च या दिवशी दिली. विधान परिषद सदस्य भाई जगताप यांनी नियम ९३ अन्वये उपस्थित केलेल्या सूचनेला उत्तर देतांना ते बोलत होते.

मंत्री योगेश कदम म्हणाले की, 

१. ‘आयआयटी’च्या एका विद्यार्थ्याच्या मित्राच्या बॅगेत ही जिवंत काडतुसे आढळून आली. संबंधित विद्यार्थी आणि त्याचा मित्र हे दोघे बिहार राज्याचे रहिवासी आहेत. वसतीगृहात पाहुण्यांना रहाण्याची अनुमती असल्याने तो मित्र तेथे वास्तव्यास आला होता.

२. अन्वेषणातून निष्पन्न झाले की, ही काडतुसे बिहारमधून मुंबईत आणण्यात आली होती. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत काडतुसे पुरवणार्‍या मुख्य सूत्रधारासह ती विकत घेणार्‍यालाही अटक केली आहे.

३. या प्रकरणातील संपूर्ण साखळीचा शोध घेऊन संबंधितांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. आयआयटी मुंबई ही केंद्रशासनाच्या अखत्यारीतील संस्था असल्याने तेथे अन्वेषणासाठी पोलिसांना पूर्वअनुमती घ्यावी लागते.

४. या घटनेमागील नेमका उद्देश काय होता, याचे अधिक अन्वेषण पोलीस करत असून चौकशीनंतर सर्व माहिती सभागृहासमोर ठेवली जाईल.